Pakistan Brahmaputra Water Threat : ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखण्याची पाकिस्तानची नापाक रणनीती!

पाकची धमकी, भारताकडून वाटाण्याच्या अक्षता


भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलं तरी पाण्यावरून सुरू झालेलं युद्ध अधिक तीव्र झालंय. भारताने १९६०च्या सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली आणि पाकिस्तानात खळबळ उडाली. दुसरीकडे पाकिस्तानने चीनच्या मदतीने ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावर बंदी घालण्याची भीती दाखवलीय. मात्र पाकिस्तानचे हे कारनामे खोटे असल्याचे भारताचे म्हणणे आहे. युद्धविरामानंतरही भारत - पाकिस्तान यांच्यात नेमकं काय सुरू आहे.



जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये सिंधू पाणी करार झाला. या करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तानला मिळतं, तर सतलज, बियास आणि रावी नद्यांचा पाण्याचा वापर भारत करतो, मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा करार स्थगित केला. याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या शेतीवर आणि पाणीपुरवठ्यावर होणार आहे.

भारत - पाकिस्तानमधील जलविवाद टाळण्यासाठी सिंधू पाणीवाटप करार करण्यात आला. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचं नाक दाबण्यासाठी भारताने सिंधू करार स्थगित केला. त्यातच आता सिंधू आणि झेलम नद्यांमधील पाण्याची पातळी कमालीची घसरलीय. याचा परिणाम पाकिस्तानमधल्या शेतीवर होणार आहे. सुमारे १ कोटी ६० लाख हेक्टर शेतजमीन धोक्यात आलीय. कराची आणि लाहोरसारख्या मोठ्या शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. सिंधू नदीवर अवलंबून असलेल्या जलविद्युत प्रकल्पांमुळे पाकिस्तानच्या २५ टक्के वीजनिर्मितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो.

भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावरून नवीन मुद्दा उपस्थित केलाय. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे समन्वयक राणा इहसान अफझल यांनी ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखण्याचा इशारा दिलाय. भारताने सिंधू नदीचं पाणी रोखलं, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखू शकतो, असा पाकिस्तानचा व्होरा आहे. खरं तर पाकिस्तानचा ब्रह्मपुत्रा नदीशी काही संबंध नाही. कारण ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमधील यारलुंग त्संगपो नदी म्हणून ओळखलं जातं. हीच ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते आणि आसाममधून बांगलादेशात जाते. डिसेंबर २०२४ मध्ये चीनने यारलुंग त्संगपो नदीवर जगातील सर्वात मोठं जलविद्युत धरण बांधण्याची घोषणा केली. या धरणामुळे भारतात विशेषतः पावसाळ्यात पुराचा धोका वाढू शकतो. चीन मोठ धरण बांधणार असला तरी ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी पूर्णपणे रोखण्याची चीनची योजना नाही. तरीही पाकिस्तानच्या ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखण्याच्या धमकीमुळे भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. चीनचं धरण भारतासाठी चिंतेचा विषय असला तरी पाणी पूर्णपणे रोखणं तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे. तसं केल्यास पर्यावरण आणि भौगोलिक परिणामांचा धोका निर्माण होऊ शकतो.


पाकिस्तानचा खोटा प्रचार


पाकिस्तानच्या या धमकीला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हा पाकिस्तानचा खोटा प्रचार आहे. ब्रह्मपुत्रा नदीचं ६५ ते ७० टक्के पाणी हे पाऊस आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्यांमुळे तयार होतं. चीनमधून फक्त ३०ते ३५ टक्के पाणी येतं. तसंच चीनने पाणी रोखलं तरी आसाममधील पूर कमी होण्याचीच शक्यता आहे. याचा फायदा स्थानिकांना होईल, असं हिमंता बिस्वा यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय आणि पाकिस्तानचा मुद्दा खोडून काढलाय. भारत-चीन सीमेवर तुतिंग या ठिकाणी ब्रह्मपुत्रेचा प्रवाह २,००० ते ३,००० घनमीटर प्रतिसेकंद आहे, तर गुवाहाटीत तो १५,००० ते २०,००० घनमीटर प्रतिसेकंदापर्यंत वाढतो. त्यामुळे चीनने पाणी रोखलं तरी भारतावर फारसा परिणाम होणार नाही, असा दावाही हिमंता बिस्वा यांनी केलाय. चीनच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाकिस्तान भारतावर गोळी झाडण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी रोखण्याचा हा त्यातलाच एक प्रकार आहे.

ब्रह्मपुत्रा ही भारताची नदी


पाकिस्तानचा हा खोटा प्रचार आहे. आम्ही घाबरणार नाही. ब्रह्मपुत्रा ही भारताची नदी आहे आणि आम्ही तिचं रक्षण करू, असा विश्वासही बिस्वा यांनी दिलाय. सिंधू पाणी करार स्थगितीमुळे भारत - पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलाय. हा तणाव पाकिस्तान कसा सहन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या करार स्थगितीमुळे पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यात भारताला सध्या तरी यश आलंय.
Comments
Add Comment

Sikkim Landslide : सिक्कीमच्या जलविद्युत प्रकल्पात भीषण दुर्घटना; बोगदा कोसळून २० जणांचा मृत्यू, ५ जण बेपत्ता

सिक्कीम : सिक्कीम (Sikkim) मधील नामची (Namchi) जिल्ह्यात एनएचपीसी (NHPC) च्या तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पातील (Hydroelectric Project)

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा