वसाका अतिथी गृहातील सामानांची चोरी

  48

सुरक्षा यंत्रणा वाऱ्यावर; कार्यस्थळ मोजतेय शेवटच्या घटका


देवळा :संपूर्ण कसमादेसह उत्तर महाराष्ट्राचे वैभव असलेला वसंतदादा पाटील कारखाना (वसाका) सध्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र असून, वसाका कार्यस्थळ आवाराची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. दोन वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्यात सामान चोरीचेही प्रकार घडत आहेत.


१५ वर्षापूर्वीपर्यंत या कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार यांचा उदरनिर्वाह होत होता. दीड दोन वर्षांपूर्वी कारखान्यासह विज प्रकल्पाच्या महाकाय ट्रान्सॅफार्मरमधून हजारो लिटर ऑइलची चोरी करून गुन्हेगार पसार झाले. चोरीचे धागेदोरे कळवणपर्यंत गेले होते. तरी पोलिसांना चोरांना पकडण्यात यश आले नाही. मधल्या काळात मुख्य कारखान्याच्या आत प्रवेश करून पश्चिम बाजूला असलेल्या दगडी भिंतींना भलेमोठे भगदाड पाडत लाखो रुपये किंमतीच्या इलेक्ट्रिक मोटारी, पितळी तसेच लोखंडी व्हॉल्वसह ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून गिरणा नदीकिनारी नेलेले सापडले होते. कोट्यावधी रुपयांचे मूल्य असलेले किंमती सामान कारखान्यात होते; परंतु दुर्दैवाने दोन वर्षांनंतर तेथे काय शिल्लक राहिले हे सांगणे कठीण आहे. नाही म्हणायला तेथे सध्या दोन तीन नर-मादी बिबट्यांचा मुक्त संचार होता. त्यामुळे काहीकाळ चोऱ्या आटोक्यात आल्या होत्या.



अगदी अलीकडेच कारखान्याच्या उत्तर बाजूस असलेल्या वातानुकुलित अतिथीगृहाच्या पाठीमागे असलेल्या शेतकरी निवासातील खोल्यांची कुलपे तोडून तेथील किमती फर्निचर, गाद्या व इतर सामान लुटून नेले असल्याचे उघडकीस आले आहे. कारखान्याच्या रोजंदारीवर कामावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विठेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी कुबेर जाधव यांच्या कानावर ही बाब टाकली असता त्यांनी कार्यस्थळावर पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचाऱी विशाल निकम, दिनेश ठाकरे, युनियन सदस्य शशिकांत पवार, दीपक पवार, रणधीर पगार उपस्थित होते.


५०० कोटींची मालमत्ता असलेल्या वसाकाची सुरक्षा वाऱ्यावर सोडून प्रस्थापितांनी पळ काढला. २५००० सभासद, शेकडो कामगारांची रोजी रोटी बुडाली. कारखान्याच्या चहुबाजूंनी चोरांचा सुळसुळाट झाला असून कारखान्याला कोणी वाली नाही. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.
- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Comments
Add Comment

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका तयारीला

इगतपुरीतील तीनलकडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त

इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील तीनलकडी पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावर मोठ्या

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक