मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकणाऱ्या गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने २ कोटी ७४ लाख १६ हजार ३४० रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध चार योजनांच्या अंतर्गत अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
विद्यार्थी विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या पुस्तक पेढी योजनेत संलग्नित महाविद्यालयातील २७ हजार ४७१ आणि शैक्षणिक विभागातील ५७ विद्यार्थ्यांसाठी मदत व अर्थसहाय्य करण्यात आले. या योजनेअंतर्गत एकूण १ कोटी ६ लाख १४ हजार ८४० रुपये विद्यार्थ्यांना देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या गरजू आणि मागासवर्गीय विद्यार्थी योजनेअंतर्गत विविध महाविद्यालयातील १९८ आणि शैक्षणिक विभागातील २२ विद्यार्थ्यांना ६ लाख ३८ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तिसऱ्या योजनेअंतर्गत महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या १ हजार ९५० विद्यार्थ्यांना १ कोटी १ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. त्यात अर्ज केलेल्या २१ महाविद्यालयातील १ हजार १०३ मुले आणि ८४७ मुलींचा समावेश आहे.
चौथ्या योजनेत विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागात शिकणाऱ्या १२० एस.सी, एस.टी.,डी.टी. आणि एन.टी. विद्यार्थ्यांना रुपये ६० लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या चारही योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यार्थी विकास विभागामार्फत स्वतंत्र संकेतस्थळ तयार करून संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. वर्षनिहाय सर्वाधिक २ कोटी ७४ लाख १६ हजार ३४० रुपयांचे अर्थसहाय्य शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी करण्यात आले आहे.
‘विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून गरजवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रत्येक वर्षीच्या मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात या योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्नशील आहे’
, असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.