Monday, June 2, 2025

IPL 2025

अंतिम फेरीत कोण, पंजाब की मुंबई?

अंतिम फेरीत कोण, पंजाब की मुंबई?
ज्ञानेश सावंत : पात्रता फेरीत मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला आणि आता अंतिम फेरीसाठी त्यांना पंजाब विरुद्ध खेळावे लागणार आहे. साखळीतील शेवटच्या सामन्यात पंजाबने मुंबईचा ७ बळींनी पराभव केला, त्यामुळे मुंबई आज त्याचा वचपा काढणार एवढे मात्र निश्चित. दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत आहे. श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून त्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असून त्याला पाँटिंगची योग्य साथ मिळत आहे. आजही ते रोहित शर्मा, बेयरस्टो, सूर्यकुमार व तिलक वर्मा यांना कसे रोखायचे यासाठी व्यूहरचना नक्कीच आखणार आहेत. बुमराहची गोलंदाजी कशी खेळून काढली पाहिजे याचा नक्कीच अंदाज बांधणार. सध्या मुंबईचा सूर्यकुमार फॉर्ममध्ये आहे; पण पंजाबकडे युजवेंद्र चहल आहे, ज्याने सूर्याला तीन वेळा बाद केले होते.



रोहित शर्मा अर्शदीप विरुद्ध खेळताना चाचपडतो हे मुंबईसाठी चिंताजनक आहे. तीच चिंता पंजाबकडे सुद्धा आहे. मार्कस स्टोइनिस बुमराह विरुद्ध खेळू शकत नाही. असो. एकंदर दोन्ही संघ एकमेकांचे कच्चे दुवे शोधणारच; पण शेवटी जो संघ फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर मेहनत घेणार तोच विजयी ठरणार. नरेंद्र मोदी मैदान जास्तीत जास्त धावसांठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे आज कोणताही संघ प्रथम फलंदाजी करणार त्याला समोरच्या संघाला मोठे आव्हान द्यावे लागणार.

चला तर बघूया अतीतटीच्या लढतीत कोण यशस्वी ठरणार, श्रेयस की हार्दिक?
Comments
Add Comment