क्राइम : अॅड. रिया करंजकर
लग्न म्हणजे सध्या एक लॉटरीची पद्धत झालेली आहे. लागली तर चांगली नाहीतर काहीच नाही. लग्न म्हणजे दोन परस्पर व्यक्ती एकत्र येणे एवढेच नाही तर दोन कुटुंबामध्ये एकत्र येणं असतं. शिवाय लग्न संतुष्टात येतं तेव्हा ही कुटुंबही दुरावली जातात.
साधना ही सुशिक्षित आणि सदन कुटुंबातली मुलगी. शिक्षित असल्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी करत होती. लग्नाचे वय झाले म्हणून तिच्यासाठी योग्य वराची शोधाशोध सुरू झाली होती. अनेक ठिकाणी तिच्या घरातल्यांनी चांगला मुलगा असेल तर सांगा असं सांगितलं होतं. तसेच वधूवर सूचक मंडळातही तिचं नाव नोंदवलं गेलं होतं. एके दिवशी संदेशचं साधनासाठी स्थळ आले. साधनाच्या आई-वडिलांनी मुलाची सखोल चौकशी केली. मुलगा हा चांगल्या ठिकाणी कामाला होता पण घरची परिस्थिती बेताची होती. आई-वडिलांचा संदेश एकुलता एक मुलगा होता. आई घरकाम तर वडील रिटायर झाले होते, पण मुलगा चांगला होता. त्याला कोणतेही व्यसन नव्हते. चांगल्या ठिकाणी कामाला असल्यामुळे आज ना उद्या आर्थिक परिस्थिती बदलेल असे साधनाच्या कुटुंबाला वाटलं म्हणून त्यांच्या घरच्यांनी दोघांचे लग्न लावून दिले.
साधना आपल्या सासरी नांदायला आली. खरोखरंच संदेश चांगला मुलगा होता ती म्हणायला लागली. मी खूप नशीबवान आहे की संदेशसारखा मुलगा मला मिळाला. सासू-सासरे दोघेही चांगले होते. तिला कुठल्याही दिराचा, नंदेचा त्रास नव्हता. कारण संदेश एकुलता एक मुलगा होता. लग्न झाल्यानंतर गावाकडे जाणे, नातेवाइकांकडे जाणे फिरण्यात एक महिना गेला.
मुंबईला आल्यावर संदेशच्या मित्राने पिकनिक काढायची ठरवली. संदेश जात नव्हता तरी त्याला जबरदस्तीने नेण्याचा ठरवले. कारण आता लग्न झाल्यामुळे याच्यापुढे तुला जमणार नाही आमच्यासोबत राहणे असे सांगून मित्रांनी आपल्यासोबत येण्यासाठी तयार केले. साधनानेही विचार केला की, संदेश पिकनिकला गेला तर मी चार दिवस माहेरी राहील. कारण थोड्या दिवसांनी ती कामावर रुजू होणार होती. त्यामुळे माहेरी पहिल्यासारखं जाता येणार नव्हतं. संदेश आपल्या मित्रांबरोबर पिकनिकला जायला तयार झाला. दोन दिवसांची पिकनिक होती. इकडे संदेश पिकनिकला गेल्यानंतर साधनाही आपल्या माहेरी राहण्यासाठी गेली. लग्नाला फक्त एकच महिना झाला होता.
सात मित्र या पिकनिकला गेले होते. यातल्या एका मित्राने आपल्या मैत्रिणीला सोबत आणले होते. याची कल्पना त्यांनी कोणाला दिली नसल्यामुळे ती मुलगी कोण आहे? कोणालाच माहिती नव्हते. पिकनिकसाठी रिसॉर्ट बुक केला होता. ही मुलगी प्रत्येकाशी ओळख करत होती आणि प्रत्येकाबरोबर जवळीक साधत होती. मजामस्तीमध्ये त्या सर्व मुलांनी तिच्याशी संबंधही ठेवले. त्यावेळी त्या मुलीने कोणती हरकत घेतली नाही की मी अमुक व्यक्तीची मैत्रीण आहे आणि हे करणे अयोग्य आहे. तिनेही त्या गोष्टीला पाठिंबा दिला. पिकनिकची मौजमजा केल्यानंतर सर्वजण घरी यायला निघाले त्यावेळी त्या मुलीने पोलीस स्टेशन गाठलं. माझ्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. रिसॉर्टला आलेल्या सात जणांची नावे तिने दिली, त्यात तिचा मित्रही होता.
मुख्य म्हणजे त्या नावामध्ये संदेशचेही नाव होते. ज्यावेळी पोलिसांनी सर्व तपासून पाहिले त्यावेळी असे समजले की, मुलीला अठरा वर्षे पूर्ण होण्यासाठी चार दिवस बाकी होते. त्यामुळे हे सर्वजण चांगल्याच प्रकारे या प्रकरणात अडकले होते. त्या सर्वांना पोस्को केसमध्ये अडकवण्यात आले.
ही गोष्ट संदेशच्या घरी समजल्यानंतर आभाळच कोसळलं. कारण पहिला धक्का लागला तो साधनाला आणि तिच्या घरातल्यांना. कारण घरची बेताची परिस्थिती स्वीकारून त्यांनी मुलीचे लग्न केले होते. साधना या धक्क्यातून बाहेरच येत नव्हती. स्वतःला सर्वांत नशीबवान समजणाऱ्या साधनाचं हे नशीब फक्त एक महिन्याचं होतं यावर तिचा
विश्वास बसत नव्हता. संदेशच्या वडिलांना ही बातमी कळताच त्यांना अटॅक आला तर आईची अवस्था नवऱ्याला बघू की मुलाला बघू अशी झाली होती. नवरा पिकनिकला गेलाय म्हणून माहेरी आलेल्या साधनाला ती परत सासरी जाऊ शकणार की नाही याची कल्पनाही नव्हती.
लग्न करताना कितीही चौकशी करा, विचार करा, ज्या काही गोष्टी व्हायच्या असतात त्या होतातच आणि त्याचा त्रास मात्र आजूबाजूच्या व्यक्तींना सहन करावा लागतो. गुन्हेगार हा जरी तुरुंगात असला तरी त्याच्या नातेवाइकांना समाजात राहताना त्यापेक्षाही खडतर आयुष्य जगावं लागतं. साधना ही सरळ मुलगी होती पण लग्न केल्यानंतर एका महिन्यानंतर तिच्या आयुष्याची उलटापालट झाली होती, ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती.
(सत्यघटनेवर आधारित)