मुंबई: मीरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी मुंबईची बोलीभाषा झालीय असं विधान केल्यानं त्यांच्यावर चौफेर टीका झाली. यादरम्यान त्यांनी हिंदीला लाडकी बहीण असे देखील म्हंटले होते, मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या वादावर सरनाईक यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे.
'मराठीचा मी सर्वाधिक सन्मान केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मी किती प्रयत्न केलेत हे सगळ्यांनाच माहिती आहे,' असे स्पष्टीकरण सरनाईकांनी दिले आहे. तसेच माध्यमांनी बातमी चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचेही त्यांनी म्हंटलं आहे.
माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की, मीरा भाईंदरमध्ये हिंदी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात हिंदी पत्रकारांचा सन्मान केला जात होता. त्यात कृपाशंकर सिंह यांच्या मुद्द्यांवर पुढे मी बोललो. माझ्या मतदारसंघात मी मराठीत बोलतो. पण मीरा भाईंदरमध्ये ८२ टक्के हिंदी भाषिक आहेत. तिथं हिंदीच बोलावं लागतं. त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, "माझ्या मतदारसंघात मी विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे ते नामदेव ढसाळ यांच्यापर्यंत मोठ्या लेखक, साहित्यिकांची नावं रस्त्यांना दिली आहेत. मी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. मराठीचाही सर्वाधिक सन्मान केला आहे."