पालघर

महापालिका अन् पोलिसांचा ‘हिशोब’ जुळेना!

  11

एकमेकांकडे करतात पैशांची मागणी:गणेश पाटील


विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रात वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर होत असलेला खर्च महापालिकेकडून पोलिसांना मागण्यात आला आहे. तर अतिक्रमण काढण्याच्या कारवाईसाठी दिलेल्या पोलीस बंदोबस्तासाठी महापालिकेने पोलिसांना पैसे द्यावेत अशी मागणी पोलीस खात्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनातील या दोन मुख्य कार्यालयांचा पैशाचा हिशोब जुळत नसल्याची परिस्थिती आहे.


वसई-विरार महापालिका क्षेत्रात अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मागविण्यात येतो.ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर पोलीस बंदोबस्ताचे बिल पालिकेकडे सादर करून पोलीस खात्याकडून बंदोबस्ताच्या पैशाची मागणी केली जाते. पोलीस अंमलदार, उपनिरीक्षक, निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा प्रकारे बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या कर्मचारी ते अधिकाऱ्यांच्या वेतनानुसार किती दिवस बंदोबस्ताची "ड्युटी" केली याचा हिशोब लावून बिल देण्यात येते. १ ऑक्टोबर २०१२ पासून १५ ऑक्टोबर २०१८ पर्यंत २ कोटी ७० लाख ९५ हजार ७९१ रुपयांची मागणी पोलीस बंदोबस्त पुरविला म्हणून महापालिकेकडे करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र गाजत असलेल्या आचोळे येथील ४१ इमारती पाडण्यासाठी ७ दिवस दिलेल्या पोलीस बंदोबस्ताचे ५९ लाख रुपये त्वरित द्यावे अन्यथा व्याज आकारण्यात येईल असे पत्र सुद्धा पोलीस खात्याने वसई-विरार पालिकेला दिले आहे. दरम्यान, पालिकेने सुद्धा वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ५० सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर झालेल्या खर्चाची मागणी पोलिसांकडे केली आहे.


मार्च २०२१ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत पोलिसांना दिलेल्या ५० सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर ५ कोटी ६३ लाख ७० हजार ५२५ रुपये खर्च करण्यात आला आहे. या रकमेतून अतिक्रमण काढण्यासाठी पुरविलेल्या पोलीस बंदोबस्ताची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम पालिकेला जमा करण्याबाबत पोलीस खात्याला १३ जानेवारी २०१५ च्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या पत्रव्यवहारानंतर सुद्धा सुरक्षा रक्षकांच्या वेतनावरील खर्चाबाबत काहीही उत्तर न देता, अतिक्रमण काढण्याच्या कारवाईसाठी दिलेल्या पोलिस बंदोबस्ताचे बिल सादर करून पालिकेला पोलीस खात्याकडून पैशाची मागणी करण्यात आली आहे.


सुरक्षा रक्षकांच्या वेतनावरील खर्च ६ कोटी
सुरक्षारक्षक मंडळ बृहन्मुंबई - ठाणे यांना ५० सुरक्षा रक्षकांच्या वेतनासाठी मार्च २०२१ ते जानेवारी २०२५ पर्यंत ६ कोटी ७ लाख ७८ हजार ६२७ रूपये पालिकेकडून देण्यात आले आहेत. संबंधित सर्व ५० सुरक्षारक्षक वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी " ट्रॅफिक वॉर्डन" म्हणून काम करतात. त्यामुळे पोलीस खात्याला बंदोबस्ताचे पैसे हवे असल्यास त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर झालेल्या खर्चातून आपल्या देयकांच्या रकमा वजा करून, महापालिकेला ३ कोटी १८ लाख ६३ हजार १४ रुपये महापालिकेला अदा करावेत असे पत्र ३ एप्रिल २०२५ रोजी पोलिस खात्याला देण्यात आले आहे.


अतिक्रमण काढताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मागविण्यात येतो. बंदोबस्ताच्या देयकाबाबत आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयातून मार्ग काढण्यात यईल.
- दीपक सावंत, उपायुक्त अतिक्रमण विभाग,
वसई-विरार पालिका.


अतिक्रमण धारकांकडून वसुली नाही
कोणतेही अतिक्रमण निष्कासित केल्यानंतर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींकडूनच ही कारवाई करण्यासाठी झालेला सर्व खर्च वसूल करण्याचा नियम आहे. मात्र अतिक्रमण निष्कासित करण्याच्या शेकडो कारवाया महापालिकेकडून करण्यात आल्या असल्या तरी अतिक्रमण करणाऱ्यांकडून कोणतीही वसुली करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.


Comments
Add Comment

वसई - विरार शहरात भाजपा संघटनेमध्ये महिला 'राज' !

जिल्हाध्यक्षपदी भाजपाने संघटनेतील महिलेस दिली संधी विरार : भारतीय जनता पक्षाच्या संघटन शक्तीमध्ये बूथ

शहरातील रस्त्यामधील दुभाजकही सौंदर्याने फुलणार

पालिकेकडून ५३ हजार शोभिवंत झाडांचे नियोजन वसई : वसई-विरार शहरात विविध प्रकारच्या कारणांमुळे प्रदूषण वाढू लागले

टायर रिसायकलिंग फॅक्टरी दिवसा बंद, रात्री सुरू

वाडा  : टायर रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांमुळे वाडा तालुक्यातील हवा दूषित झाली होती. त्यामुळे वडवली गावाच्या