भगवंताला शरण जावे

अध्यात्म ब्रह्मचैतन्य : श्री गोंदवलेकर महाराज


,मी जे-जे करतो ते-ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे, हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते; याकरिता, कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे.


भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही, तर त्याला पापी कसे म्हणावे? जो काळ भगवंत स्मरणात जातो, तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वत:ला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वत:ला विसरू? मला सगुणांत प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते, तोपर्यंत सगुणभक्ती करावी. गुरूच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो, म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली? यामध्ये अभिमान अनासाये मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा नाही पाळता येत. गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधूनमधून वर काढतेच, पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही, की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली, तरी गुरुआज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला, गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे? ‘मी देही नाही’ असे म्हणत राहिला, तर माणूस केव्हातरी देहातीत होईल.


आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक, दोघेही प्रपंच करतात; पण प्रापंचिक, कर्तेपणा आपल्याकडे घेतात, तर संत ‘राम कर्ता’ असे म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत, तर सुखदु:ख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वत:ला विसरतो, मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार? तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते. ‘किती दिवसांत मुक्ती मिळेल?’ याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. ‘ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वत:ला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल.’ स्वत:ला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे.


कृती करणाऱ्याचाच वेदान्त खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचेसुद्धा प्रेम जर वाढते, तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार ? भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे.


तात्पर्य : देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत, म्हणून नाम घेत, तसे वेगळे राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल.

Comments
Add Comment

ठरलं तर ! इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात होणार 'या' महाराजांचे कीर्तन

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार

श्रद्धा की अंधश्रद्धा?

आत्मज्ञान : प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनाच्या घडणीत ‘श्रद्धा’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

आत्मतेजाचा निनाद अंतरी सद्गुरूंचा नाद

ऋतुराज : ऋतुजा केळकर “वाऱ्याच्या लयीसंगे विवेक जागतो... स्मरणातल्या सुरांनी मन शुद्ध होतं... सद्गुरूंच्या कृपेने

मनुष्य जन्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आपण सध्या प्रबोधनासाठी घेतलेला विषय म्हटला तर अत्यंत कठीण आहे. म्हटले तर खूप

ज्ञानाचा सोपान

भारतीय संत : डॉ. अनुराधा कुलकर्णी निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या नावाची संगती

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि