मुंबई: मुंबईच्या एक्वा लाइन-3 ला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. दरम्यान, पाणी साचल्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुयारी मेट्रोकडे जाणारे गेटही बंद करण्यात आला आहे.
मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 मार्गिकेला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबई आणि उपनगरातील वाहतूक सुखकर करण्यासाठी सुरू केलेल्या या एक्वा लाइन-3 मध्ये पहिल्याच पावसामुळे प्रवासांची गौरसोय झाली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळी पर्यंतच्या मार्गिकेला पहिल्या पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे.
आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकात पाणीच पाणी
पावसाचे पाणी हे भुयारी मेट्रोच्या स्थानकांमध्ये शिरले. पाण्याचा लोंढा आत शिरल्यामुळे भुयारी मेट्रो स्थानकांच्या छतामधून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. एवढेच नव्हे तर भुयारी मेट्रोच्या वरळी स्थानकात पाणी शिरल्याने येथील सुरक्षा उपकरणे, चेकिंग पॉईंट, सरकते जिने आणि लाखोंच्या उपकरणांचे नुकसान झाले आहे. पाणी शिरल्यामुळे या मेट्रो स्थानकातील अनेक गोष्टी निकामी झाल्याचे दिसून आले. सध्या मेट्रो प्रशासनाने एक्वा लाईन बंद केली आहे.
पावसामुळे पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वेसेवा देखील विस्कळीत
वेळेपूर्वी आलेल्या मान्सूनने भुयारी मेट्रो स्थानकाची वाताहत तर केलीच, पण त्याबरोबरच मुंबई आणि उपनगरातील लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांवरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक 40 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे ते कल्याण जलद आणि धिमी वाहतूक 15 मिनिटं उशिराने सुरु आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काही इंडिकेटर बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. तर काही काळ ठप्प झालेली हार्बर मार्गावरील सेवा पूर्ववत झाली आहे. मात्र वाहतूक उशिराने सुरु आहे. याशिवाय सीएसएमटी स्थानकात एक्सप्रेस ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी आल्याने काही गाड्यांची वेळ बदलण्यात आलीय. सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी गाडी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी रवाना होणार आहे. तर सीएसएमटी-धुळे एक्सप्रेसही 1 वाजून 40 मिनिटांनी रवाना होणार आहे. तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट- मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात 200 मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे. सातारा आणि घाट परिसर, पुण्यातील घाट परिसर इथे देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे