मुंबई : मे महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला फटका बसला. एरवी घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात संथ गतीने झाली. सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सब वे पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रुळ गायब झाले. रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पश्चिम रेल्वेच्या गाड्या दहा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. ऑफिसला जात असलेले अनेकजण पावसामुळे ठिकठिकाणी अडकले आहेत. मिळेल त्या वाहनाने पुढे प्रवास करुन जात आहेत.
मध्य रेल्वेच्या मशिद बंदर तसेच चुनाभट्टी आणि सायन या स्थानकांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक पुरती कोलमडली आहे.
केईएम रुग्णालयाच्या आवारातही पाणी साचले आहे. गांधी मार्केट, सायन रोड क्रमांक २४, वडाळा उड्डाणपुलाखालील भाग, हिंदमाता येथे पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे.
भरती आली असल्यामुळे उंचच उंच लाटा येत आहेत. नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.