
- आंबेनळी घाटातील रस्तारूंदीकरणावर झाडं कोसळली
- पोलादपूर महाबळेश्वर वाई रस्ता पावसाळी असुरक्षितच
- साईडपट्टीवर ढिसाळ संरचना, संरक्षक भिंती कोसळल्या
- रस्ता रुंदीकरणामुळे नद्यांच्या प्रवाहालाही धोका
शैलेश पालकर
पोलादपूर : रविवारी रात्रीपासून झालेल्या संततधार पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासांत ९४ मिमी पावसाची नोंद पोलादपूर तहसील आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत झाली असून सोमवारीही ८३ मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे दोन ठिकाणी झाडे आणि मातीचे ढिगारे कोसळले, त्यामुळे आंबेनळी घाट एकेरी वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाद्वारे सुरू असलेल्या पोलादपूर–महाबळेश्वर–सुरूर (राज्य महामार्ग क्र. १३९) रस्ता रुंदीकरण प्रकल्पात अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. १०८ कोटी खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत सुमारे २३.८ किमी लांबीचा रस्ता १० ते १८ मीटरपर्यंत रुंद केला जात आहे. यामध्ये डोंगर उतार कापून, उत्खनन केलेली माती सावित्री आणि चोळई नद्यांच्या किनाऱ्यांवर टाकली जात असल्यामुळे नद्यांच्या प्रवाहालगतच्या परिसरालाही धोका निर्माण झाला आहे.

मोरे गावाचा संपर्क तुटला; ठेकेदाराच्या हलगर्जीपणावर ग्रामस्थ संतप्त मुरुड : मुरुड तालुक्यातील मोरे गावाला जोडणारा पर्यायी रस्ता जोरदार पावसात ...
रविवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे पोलादपूर ते दाभिळ या डोंगराळ पट्ट्यातील रस्त्यालगतची झाडे व माती रस्त्यावर आली. हे हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या ठिकाणी सुरक्षा कठड्यांच्या नावाखाली सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांत माती भरून बनवलेले अर्धवट उपाय करण्यात आले आहेत. यामुळे घाटातील तीव्र वळणांवर वाहनांचे अपघात होण्याचा धोका त्यामुळे वाढला आहे.
तसेच पळचिल गोलदरा येथील रमेश शेलार यांचे घर आणि कुडपण येथील मंगल चिकणे यांच्या घराच्या संरक्षक भिंती पावसामुळे कोसळल्या असून पडवीचे पत्रे उडाले आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी आणि वाहनधारकांनी डोंगरकापीच्या आणि ढिसाळ सुरक्षेच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकल्पावर त्वरित लक्ष न दिल्यास मोठ्या दुर्घटनांची शक्यता नाकारता येत नाही.