१ जूनला गोवा, कोकणात मान्सून !

मुंबईसह महाराष्ट्राला पाऊस झोडपणार ! २७ मेपर्यंत केरळमध्ये होणार दाखल


मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज, तर रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट


मुंबई(प्रतिनिधी): भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या ताज्या अंदाजांनसार यंदा नैऋत्य मान्सून तब्बल ६ दिवस अगोदर केरळ किनारपट्टीला धडक देणार आहे तर १ जूनपर्यंत तो गोव्यात व शेजारच्या कोकण भागात पोहोचण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यामुळे हा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चक्रीयवाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील ३-४ दिवसांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. येत्या ३६ तासांत हा पट्टा उत्तरेकडे सरकण्याची व आणखी तीव्रतेने डीप्रेशन तयार होण्याची अपेक्षा आहे. या बदलांमुळे गोव्यात व कोकण परिसरात १ जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने राज्यात मोठी पडझड घडविली असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळाची शक्यता निर्माण झाली आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाकडून खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र बनत चालल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुरगाव बंदरासह समुद्रात इतर ठिकाणी असलेल्या बार्ज व मोठ्या बोटी सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बुधवारपासूनही मुंबईत विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने मुंबईला पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला होता. आता पावसाचा जोर आणखी वाढला असून शनिवार, रविवार हे दोन दिवस मुंबईसह इतर जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. राज्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला असून यंदा मे महिन्यातच पावसाचे आगमन झाले आहे. या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, कोकणासह गुजरातपर्यंत पाऊस धो-धो बरसणार आहे.



कोकणात अतिमुसळधारेचा इशारा


आयएमडीचे शास्त्रज्ञ अखिल श्रीवास्तव यांनी सांगितल्यानुसार, सध्या अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. यामुळे कोकण गोव्यात पुढील तीन दिवसांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या कमी दावाचे क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची तीव्र शक्यता आहे. या चक्रीवादळाचा अधिकृत इशारा देण्यात आलेला नाही, आयएमडीचे शास्त्रज्ञांनी याबाबत संकेत दिले आहे.



महावितरणकडून 'हाय अलर्ट' जारी


अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीज पुरवठ्यासाठी आपत्कालिन नियोजन करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी राज्यातील वीज पुरवठ्याचा आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, मुख्यालय व परिमंडलस्तरावर २४x७आपत्कालिन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची लगेचच स्थापना करावी. कोणीही मुख्यालय सोडू नये, असे निर्देश लोकेश चंद्र यांनी दिले.



मासेमारीला फटका


मुसळधार पाऊस, वादळी वारे, खवळलेल्या समुद्राची परिस्थिती पाहता, हवामान विभागाने मच्छीमारांना २७ मेपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी लहान जहाजे व शिपिंग क्रियाकलापांवर २६ मे पर्यंत देखरेख, नियमनाचे निर्देश दिले आहेत. पश्चिम किनाऱ्यावरील पर्यटन व मनोरंजनात्मक क्रियाकलापांवरही योग्य नियंत्रण ठेवण्यात आले आहे.



रायगडला पावसाने झोडपले


रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी, चाकरमानी आणि मच्छीमार वर्ग यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी लग्न कार्य सुरू असताना आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रायगड जिल्ह्यात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनीही आपली होडी किनाऱ्यावर आणली आहे.

Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे