Tuesday, June 17, 2025

Maharashtra School: राज्यातील ७५० शाळा बंद पडण्याचा धोका

Maharashtra School: राज्यातील ७५० शाळा बंद पडण्याचा धोका
पुणे: शालेय शिक्षण विभागाने संच मान्यता निकषांत बदल केल्यामुळे राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना शिक्षक मिळणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांअभावी राज्यातील सुमारे ७५० शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे,’ असा दावा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केला.

संघाचे सचिव नंदकुमार सागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शिवहार लहाने, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी राजेश गायकवाड, विठ्ठल माळशिकारे, प्रवीण गायकवाड, प्रसाद गायकवाड उपस्थित होते.

राज्यातील आठ हजारांहून अधिक गावे शिक्षण सुविधेपासून वंचित आहेत. या गावांमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपलब्ध नाही. सुमारे ६५६३ गावांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय नाही, तर १६१० गावांमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी शाळाच नाहीत. अशी परिस्थिती असूनही शालेय शिक्षण विभागाने संच मान्यता निकषांमध्ये बदल करून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर एकही शिक्षक मंजूर न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील सुमारे ७५० शाळा बंद पडण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment