नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
राजेंद्रकुमार आणि साधनाचा ‘आरजू’(१९६५) म्हणजे संगीताची मेजवानीच होती. सिद्धहस्त गीतकार हसरत जयपुरी, सुपरस्टार संगीतकार शंकर-जयकिशन, लतादीदी, आशाताई, रफीसाहेब, शमशाद बेगम या अतिशय प्रतिष्ठित कलाकारांनी १९६५ मध्ये ही मैफल सजवली होती. तिची मजा, तिचा खुमार युट्यूबमुळे आजही घेता येतो हे तसे केवढे सुदैव!
आरजूची कथा एका गैरसमजावरची आणि निरागस प्रेमाच्या शक्तीची कथा होती. उषाला (साधना) अपंगत्वाबद्दल तिरस्कार आहे. ‘अपंगाचे जीवन जगण्यापेक्षा मरून जाणे बरे’ असे ती एकदा सरजूशी (राजेंद्रकुमार) बोलताना म्हणते. पुढे राजेंद्रकुमारला अपघात होऊन त्याचा एक पाय जातो. त्यामुळे तो स्वत:हूनच तिला काही न सांगता तिच्या आयुष्यातून निघून जातो. त्यानंतर अनेक घटना घडून शेवटी त्याला उषाच्या अढळ प्रेमाची खात्री पटते आणि सिनेमा सुखांत होऊन जातो.
‘आरजू’चे कलाकार होते राजेंद्रकुमार (सरजू), साधना (उषा कपूर), फिरोझ खान (रमेश), मेहमूद अली, नाझीर हुसैन (दिवान किशन किशोर), इंग्रजी सिनेमातही चमकलेला मराठी अभिनेता नाना पळशीकर (डॉक्टर), धुमाळ (मुन्शी) आणि नझीमा (सरला). लेखक, निर्माते, दिग्दर्शक रामानंद सागर यांनी ‘आरजू’ बेतला होता ‘अॅन अफेयर टू रिमेम्बर’वर. सिनेमाला विविध पुरस्कारांसाठी ५ नामांकनेही मिळाली. मात्र तो रसिकांच्या लक्षात आहे त्याच्या कर्णमधुर गाण्यांसाठी! ते श्रेय सुपरस्टार-संगीतकार शंकर-जयकिशन यांचेच.
आरजूच्या गाण्यांच्या नुसत्या पहिल्या ओळी ऐकल्या तरी हुरहूर वाटत राहते की गेल्या काही दशकात आपण किती अनमोल गोष्टी कायमच्या गमावल्या! कारण आता पुन्हा अशी गाणी लिहिली जाणार नाहीत आणि असे शंकर-जयकिशन होणार नाहीत! आरजूमध्ये एक कव्वाली होती.
“ जब इश्क कही हो जाता हैं, तब ऐसी हालत होती हैं,
महफिलमे जी घबराता हैं, तनहाईकी आदत होती हैं.”
प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या आगळ्याच मन:स्थितीचे किती सुंदर वर्णन! प्रेमिकेला मित्र-मैत्रिणीपासून दूर जाऊन मनातल्या मनात ‘त्याच्या’सहवासाची गोड कल्पनाचित्रे काढणे, दिवास्वप्ने रंगवणे कसे आवडू लागते ते गीतकारांनी नेमके मांडले होते. मुबारक बेगम आणि आशा भोसलेंच्या आवाजातल्या या गाण्यात संगीतकारांनी एक धाडसी प्रयोग केला. धृवपद पारंपरिक कव्वालीच्या शैलीत आणि मधले संगीत चक्क जाझसारखे पाश्चिमात्य! असेच दुसरे गाणे होते.
“बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता हैं,
बरसता हैं जो आंखो से वो सावन याद करता हैं.”
अपंगत्वामुळे राजेंद्रकुमार साधनाच्या जीवनातून गुपचूप निघून गेला आहे. साधनाला त्याला शोधणे अशक्य झाले आहे आणि ती त्याच्या आठवणीत झुरते आहे. अवघ्या दोन ओळींत सगळे बसवले हसरत साहेबांनी! या गाण्याने अस्वस्थ झाला नाही असा रसिक मिळणार नाही. असेच दुसरे एक गाणे प्रेमातील प्रारंभिक प्रियाराधनाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणावे लागेल
“ए फुलों की रानी, बहारों की मलिका,
तेरा मुस्कुराना गजब हो गया.”
रफीसाहेबांनी गायलेले हे गाणे प्रेमातूर तरुणात पिढ्यानपिढ्या लोकप्रिय राहिले! असेच प्रेयसीच्या सौंदर्याने घायाळ झालेल्या प्रियकराची मानसिकता प्रकट करणारे गाणे होते-
“छलके तेरी आंखो से शराब और जियादा,
खिलते रहे होठों के गुलाब और जियादा!”
जणू तिच्या नयनातून मदिरा ओघळते आणि ती प्रियकराला बेधुंद करून टाकते. तिचे ओठही गुलाबाच्या कळ्यांसारखे हळूहळू उमलताहेत आणि हा म्हणतो, ‘ते अजून विलग होऊन त्यातून प्रेमाचे चार मधुर शब्द बाहेर येऊ देत.’‘आरजू’मधली सर्वच गाणी अशी रोमँटिक, सघन आणि कर्णमधुर होती. राजेंद्रकुमार आणि साधनामध्ये सुरुवातीची नोकझोक सुरू आहे. काश्मीरच्या एका नयनरम्य दरीत साधना घोड्यावरून चालली आहे. राजेंद्रकुमार तिला वश करण्याचा प्रयत्न करतो आहे असा प्रसंग होता. आमच्या हसरत साहेबांचे गाणे लगेच तयार
‘ए नर्गीसे मस्ताना, बस इतनी शिकायत हैं,
समझा हमे बेगाना, बस इतनी शिकायत हैं.’
दुसऱ्या एका गाण्यात ती रुसलेल्या राजेंद्रकुमारला मनवते असा प्रसंग होता. उत्कट प्रेम, स्वत:च्या प्रेमावरचा दृढ विश्वास, जिवलगाचे मन जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी या सगळ्याचे सुंदर मिश्रण म्हणजे हे गोड प्रेमगीत! साधना म्हणतीये, ‘प्रिया, तू माझ्यावर रुसून जाशील तरी कुठे? आणि जिथे कुठे जाशील तिथे तर मी असणारच आहे’.
‘अजी रूठकर अब कहाँ जाईयेगा,
जहाँ जाईयेगा, हमें पाईयेगा.’
प्रिया, तू माझ्या नजरेआड जाऊच शकणार नाहीस. कारण माझे सगळे लक्ष फक्त तुझ्याकडेच आहे! आणि दूर गेलास तरी माझ्या हृदयातून कसा जाशील? तिथून जाऊन दाखव! कुठेही लपलास तरी माझ्या नजरेत असणारच आहेस.
‘निगाहोंसे छुपकर दिखाओ तो जाने,
खयालों में भी तुम ना आओ तो जाने,
अजी लाख परदों में छुप जाईयेगा,
नजर आईयेगा, नजर आईयेगा.’
हे गाणे ती पार्टीत गात असल्यामुळे तिला इतरांचा विचार करणे भाग आहे. सगळेच काही व्यक्त करता येत नाही. म्हणून ती त्याला विनवते, ‘मला सगळेच बोलायला लावू नकोस. काही गोष्टी तुझ्या तूच समजून घे ना. माझ्या डोळ्यांत बघ. माझ्या नजरेतून त्या तुला दिसतील. थोडे समजावून घेऊन त्यांच्याकडे जरा लक्ष देशील? या कडव्यातली ‘समझकर जरा गौर फरमाईयेगा’ ही लाडिक अजिजी मोठी गोड आहे.
‘जो दिल में हैं होठों पे लाना भी मुश्किल,
मगर उसको दिल में छुपाना भी मुश्किल,
नजरकी जुबांसे समझ जाईयेगा,
समझकर जरा गौर फरमाईयेगा.’
माझी मन:स्थिती जरा लक्षात घेशील? तुझ्या प्रेमाने मला जणू संमोहित करून टाकले आहे. त्या जादूचा केवढा अंमल आहे माझ्यावर! मन अगदी थाऱ्यावर नाही रे! नजर भिरभिरते आहे. मला जरा सावरू तर दे, मग जायचेच असले तर जा. पण नको, नको! थांब की रे! जिवलगा, असा रुसून जाशील तरी कुठे?
‘ये कैसा नशा हैं, ये कैसा असर हैं,
ना काबू में दिल हैं, ना बस में नजर हैं.
जरा होश आ ले, चले जाईयेगा,
ठहर जाईयेगा, ठहर जाईयेगा.
अजी रूठकर अब कहाँ जाईयेगा...’
जुन्या काळातली शांत सुस्थीर जीवनशैली, त्यातून निर्माण झालेल्या रसरशीत कलाकृती, त्यात मानवी भावनांचे केलेले प्रांजळ मनोज्ञ चित्रण अनुभवणे हा एक वेगळाच आनंद असतो. पण त्यासाठी मागे जाणेच श्रेयस्कर, नाही?