पालघर : पूर्व-मध्य आणि उत्तरेकडील अरबी समुद्रात, दक्षिण गुजरात-उत्तर कोकण किनाऱ्याजवळ सुमारे १.५ किमी उंचीवर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे आणि २१ मे च्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची संभावना आहे व त्यानंतर, कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून २२ मे पासून उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याने १९ मे ते २५ मे २०२५ दरम्यान महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
१८ ते २० मे २०२५ दरम्यान, बहुतांश जिल्ह्यासह पालघर जिल्हातही काही ठिकाणी विजांसह मेघगर्जना, ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाहणारे जोरदार वारे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २१ ते २५ मे दरम्यान मात्र संपूर्ण कोंकणसह पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. वीजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा दिला असल्याने दामिनी अॅप्लीकेशनचा वापर करावा. अँन्ड्रॉईड मोबईलवरील गुगल प्ले स्टोअर या अॅपवर दामिनी अॅप्लीकेशन सहजरीत्या डाऊनलोड करता येते. अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली आहे.
कृषी सल्ला : भात, भुईमूग, परिपक्व फळे व भाजीपालाचे नुकसान होऊ नये म्हणून लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना मातीची भर द्यावे व काठीचा आधार देवून दोरीने बंधावे. जनावरांचा चारा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करा व जनावरांचे शेड कमकुवत असेल, तर डागडुजी करून घ्यावी जेणेकरून नुकसान होणार नाही. हा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे. मच्छीमारांसाठी सल्ला पुढील काही दिवस कोकण आणि गोवा किनाऱ्याजवळ ३५-४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मत्स्य व्यावसायिकांना या काळात समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.