३२ कोटींचे ‘गणित’ जुळविण्यात होणार अनेकांचा ‘हिशोब’!

‘ईडी’च्या कारवाईनंतर रेड्डी समर्थक चिंतेत


गणेश पाटील


विरार : नालासोपाऱ्यातील ४१ अवैध इमारतीच्या बांधकामातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत वसई-विरार महानगरपालिका नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याकडे सापडलेल्या ३२ कोटींच्या घबाडाचा ईडी कडून होणारा "हिशोब" आता अनेकांचे "गणित" बिघडविणारा ठरणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे रेड्डींचे "खास" म्हणून मिरविणारे अधिकारी कर्मचारीच नव्हे तर राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा चिंतेत पडले आहेत. वसई-विरार पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारण प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर अवैधरित्या ४१ इमारती बांधून त्यातील खोल्या व सदनिका गरीब नागरिकांना विक्री करण्यात आल्या. बांधकाम करण्यात येत असलेल्या इमारती अवैध असतानाही विक्री केल्यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक केली म्हणून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांच्यासह आणखी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. हाच धागा पकडत अंमलबजावणी संचालनालय ईडीने कारवाई सुरू केली असल्याचे स्पष्ट केले आहे. ईडीच्या पथकाने दोन दिवस वसई विरार, बोरिवली, मुंबई आणि हैदराबाद येथे १३ ठिकाणी छापेमारी करून अनेक गुन्हेगारी कागदपत्र जप्त केल्याचे म्हटले आहे. ईडीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याकडे २३ कोटींचे दागिने आणि ९ कोटी रुपये रोख स्वरूपात सापडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र इतर १२ ठिकाणी केलेल्या कारवाईत नेमके काय घबाड हाती लागले याबाबत ईडीकडूनच काही सांगण्यात आलेले नाही.


दरम्यान, केवळ ४१ इमारतीच्या अवैध बांधकामात गुप्ता आणि रेड्डी यांनी कोट्यवधीची माया जमविली. हे कोणालाही न पटण्यासारखे आहे. त्यामुळे रेड्डी यांच्याकडे सापडलेल्या ३२ कोटींच्या घबाडाचा "हिशोब" आता ईडीकरून सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ईडीने केलेल्या छापेमारीतील १२ ठिकाणे कोणती आणि त्या ठिकाणाहून ईडी पथकाच्या हाती काय लागले हे अद्याप उजेडात आलेले नाही.


त्यामुळे रेड्डी यांच्याकडून कोणतीही वैध - अवैध काम करून घेण्यात बाद 'शहा' असलेल्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह बांधकाम क्षेत्रातील रेड्डी यांचे खास मित्र ईडीने सांगितलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कागदपत्रांबाबत चिंतेत पडले आहेत. महापालिकेचे काही कर्मचारी, अधिकारी हे सुद्धा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या वाय. एस. रेड्डी यांच्या फाईल, मध्यस्थी आणि "रेट"ची चर्चा आता सर्वत्र होऊ लागल्याने विचारात पडले आहेत.


कारवाईची नव्हे; दागिने आणि रोख कमी मिळाल्याची चर्चा


महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानातून हिरेजडित दागिन्यांसह रोख अशाप्रकारे ३२ कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल ईडीने जप्त केला आहे. या कारवाईनंतर वसई-विरारमध्ये सुरू असलेल्या चर्चेत आणखी इतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याच्या चर्चेपेक्षा रेड्डी यांच्याकडे सापडलेले दागिने आणि रोख कमी असल्याबाबतचीच चर्चा जास्त प्रमाणात होत आहे. रेड्डी यांच्यावर ‘वरकमाई’नुसार सापडलेले दागिने आणि रक्कम निम्म्याहून कितीतरी कमी असल्याबाबत होत असलेली चर्चा ‘चर्चेचा विषय’ बनली आहे.


वादग्रस्त कारकिर्दीतील आत्मविश्वास नडला


शासकीय सेवेत लाच देण्याच्या प्रकरणात अडकून वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली असतानाही, रेड्डी यांनी अवैध कमाईचा फंडा सोडला नाही. वसुलीचा मार्ग मात्र त्यांनी सावधरीत्या जोपासला. नुकतेच त्यांच्याच विभागातील एका महिला अधिकाऱ्याची सायबर भामट्यांकडून ६० लाख रुपयांनी फसवणूक झाली. तेव्हा ‘वरकमाई’चे पैसे अशाप्रकारे ‘व्हाईट’मध्ये न ठेवण्याचा उघड सल्ला देणाऱ्या रेड्डी यांच्याच घरात इतके मोठे घबाड सापडल्याने, अनेक जण त्यांच्या या अती आत्मविश्वासू वृत्तीबाबत कोड्यात पडले आहेत.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक