जॉन स्पेन्सर
भारताने ऑपरेशन सिंदूर समाप्त झाल्याचे अद्याप जाहीर केलेले नाही. मोहिमेमध्ये घेतलेला एक संवेदनशील विराम म्हणून या स्थितीकडे बघता येईल. काहीजण याला युद्धविराम असेही संबोधतील, मात्र लष्करातील प्रमुख अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून तो शब्द टाळला आहे. युद्धसंघर्षाच्या दृष्टिकोनातून हा केवळ एक अल्पविराम नव्हे, तर एका दुर्मीळ आणि निःसंदिग्ध यशानंतरची लष्कराची ही एक धोरणात्मक पकड आहे. भारताने मोठा विजय मिळवला आहे. हे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या लष्करी कारवाईच्या केवळ चार दिवसांनंतर दिसणारे एक निर्णायक सत्य आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करणे, आपले लष्करी सामर्थ्य दाखवणे, शत्रूला पुन्हा अशी कारवाई करण्यापासून परावृत्त करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेचा नवीन सिद्धांत आखणे ही आपली धोरणात्मक उद्दिष्टे पूर्ण करतानाच त्याही पलीकडे यश प्राप्त केले आहे.
भारतावर हल्ला झाला. २२ एप्रिल २०२५ रोजी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे हत्याकांड घडवून आणण्यात आले. यात २६ भारतीय नागरिकांची, बहुतांश हिंदू पर्यटकांची हत्या करण्यात आली. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा (एलईटी)ची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ)ने या कृत्याची जबाबदारी स्वीकारली. गेल्या अनेक दशकांप्रमाणे चालत आल्यानुसार, या गटाला पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI)चा पाठिंबा आहे. मात्र गेल्या काही हल्ल्यांप्रमाणे भारताने यावेळी प्रतीक्षा केली नाही. यावेळी भारताने आंतरराष्ट्रीय मध्यस्थींची विनंती केली नाही किंवा एखाद्या राजनैतिक हस्तक्षेपाची अपेक्षा केली नाही, तर भारताने विमाने डागली. ७ मे रोजी भारताने एक अत्यंत गतिमान आणि अचूक नियोजनबद्ध लष्करी मोहीम अर्थात 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये असलेल्या नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य केले, ज्यामध्ये 'जैश-ए-मोहम्मद' आणि 'लष्कर-ए-तैयबा' सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्य अड्डे आणि कारवायांच्या केंद्रांचा समावेश होता. यातून एक स्पष्ट संदेश गेला की, पाकिस्तानी भूमीवरून होणारे दहशतवादी हल्ले आता युद्ध म्हणून मानले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन सिद्धांत आखला आहे, 'भारत कोणत्याही आण्विक ब्लॅकमेलला भीक घालणार नाही. आण्विक ब्लॅकमेलच्या आडून फोफावणाऱ्या दहशतवादी अड्ड्यांवर भारत अचूक आणि निर्णायक हल्ला करेल'. ही भावना प्रतिशोधापेक्षाही अधिक एका धोरणात्मक सिद्धांताची स्पष्ट आणि निर्भयपणे केलेली मांडणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे, दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत. पाणी आणि रक्त हे देखील एकत्र वाहू शकत नाही.
ऑपरेशन सिंदूर नियोजनबद्ध टप्प्यांमध्ये राबवण्यात आले. ७ मे या दिवशी पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर नेमके नऊ अचूक हल्ले करण्यात आले. यामध्ये बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद आणि इतर ठिकाणी असलेल्या प्रमुख दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आणि पायाभूत सुविधांचा समावेश होता. ८मे ला पाकिस्तानने भारताच्या पश्चिमेकडील राज्यांवर मोठ्या प्रमाणात सोडलेल्या ड्रोनने प्रत्युत्तर दिले. भारताच्या स्वदेशी बनावटीच्या आणि रशिया आणि इस्रायलच्या तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या बहुस्तरीय हवाई संरक्षण नेटवर्कने या ड्रोनना हवेतच नेस्तनाबूत केले. ९ मे ला भारताने सहा पाकिस्तानी लष्करी हवाई तळांवर आणि यूएव्ही समन्वय केंद्रांवर अतिरिक्त हल्ले करून या कारवाईचे स्वरूप तीव्र केले. १० मे ला कारवाईला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. भारताने याला कधीही युद्धविराम असे संबोधले नाही. भारतीय लष्कराने याला 'गोळीबाराला तात्पुरती स्थगिती' असे म्हटले आहे. हा एक अर्थपूर्ण आणि जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. ज्यामुळे आपले परिस्थितीवरील धोरणात्मक नियंत्रण अधिक मजबूत झाले. हा केवळ एक रणनैतिक विजय नव्हता, तर चालू युद्धातील सैद्धांतिक अंमलबजावणी होती.
साध्य झालेली धोरणात्मक उद्दिष्टे
१) एक नवीन मर्यादारेषा आखली गेली आणि ती लागू झाली. पाकिस्तानच्या भूमीतून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना आता संरक्षण दलांना तोंड द्यावे लागेल. ही काही धमकी नाही, तर दाखला आहे.
२) लष्करी सामर्थ्याचे दर्शन भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे, समन्वय केंद्र आणि वेळ आल्यास हवाईतळ यांसारख्या कोणत्याही ठिकाणाचा आपल्या अटीशर्तीनुसार लक्ष्यभेद करण्याची क्षमता दाखवून दिली. दरम्यान, पाकिस्तानला भारताच्या आत एकाही संरक्षित क्षेत्रात प्रवेश करता आला नाही. यात कुठेही साम्य नाही, तर श्रेष्ठत्व आहे आणि अशाप्रकारे दहशतवादी कृत्यांवर खरा वचक बसेल.
३)दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी भारताने जगाला एक नवीन मार्ग दाखवला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले पण पूर्ण युद्ध न होता ते थांबले. मात्र असे असले तरी भारताच्या वाढत्या नियंत्रणामुळे एक स्पष्ट प्रतिबंधक संकेत मिळाला आणि तो म्हणजे : भारत प्रत्युत्तर देईल आणि वेग मर्यादा देखील भारतच ठरवेल.
४) ठाम धोरणात्मक स्वातंत्र्य भारताने ही घटना कोणत्याही आंतरराष्ट्रीय मध्यस्थीशिवाय हाताळली. भारताने सार्वभौम मार्गांचा वापर करून, सार्वभौम अटींवर सिद्धांत लागू केला.
ऑपरेशन सिंदूर हे काही बळकावणे किंवा राजवट बदलण्यासाठी नव्हते, तर हे काही विशिष्ट कालमर्यादेसाठी आणि ठराविक उद्दिष्टांसाठी पुकारलेले युद्ध होते. भारताने हा लढा आणखी पुढे न्यायला हवा होता असा युक्तिवाद करणारे टीकाकार एक मुद्दा विसरतात. धोरणात्मक यश हे विध्वंसाच्या प्रमाणावर अवलंबून नसते, तर ते इच्छित राजकीय परिणाम साध्य करण्यावर अवलंबून असते. भारत काही सूड घेण्यासाठी लढत नव्हता, तर त्यांना पायबंद करण्यासाठी लढत होता आणि त्याचा खरोखरच परिणाम झाला. भारताचा संयम हा भारताचा कमकुवतपणा नव्हे, तर त्याची प्रगल्भता आहे. भारताने शत्रूला किंमत मोजायला लावली, त्यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या आणि आपले प्रभुत्व सिद्ध केले. भारताने धोरणात्मक समीकरणे बदलली. एका अशा युगात जिथे आधुनिक युद्ध अनेक नवीन आव्हानांत आणि राजकीय संभ्रमात परावर्तित होतात, त्या युगात ऑपरेशन सिंदूर वेगळे दिसते. यामध्ये स्पष्ट उद्दिष्टे, शिस्तबद्ध लष्करी धोरण, सुसंबद्ध मार्ग आणि साधने आणि अंदाज लागणार नाही अशा कठीण परिस्थितीला तोंड देताना अनुकूल अंमलबजावणी या गोष्टींचा समावेश आहे. भारताने एक धक्का सहन केला, स्वतःचे उद्दिष्ट निश्चित केले आणि ते साध्य केले आणि ते ही एका मर्यादित वेळेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये केलेल्या बळाचा वापर प्रचंड असला तरी तो नियंत्रित, अचूक, परिणामकारक आणि कोणताही संकोच न करता केला होता. आधुनिक युद्धांमध्ये अशाप्रकाची स्पष्टता दुर्मीळ आहे. 'कायमस्वरूपी युद्ध' आणि धोरणात्मक दिशा नसलेल्या हिंसाचाराच्या चक्रांनी व्याप्त युगात, ऑपरेशन सिंदूरचे वेगळेपण दिसून येते. हे एका मर्यादित युद्धाचे मॉडेल मांडते ज्याचा शेवट स्पष्टपणे परिभाषित केला आहे, पद्धत आणि मार्ग यांचा मेळ घालून आपणहून पुढाकार न घेण्याच्या वृत्तीचे दर्शन यातून घडते.
२००८ मधील भारताने हल्ले सहन केले आणि वाट बघितली. आताचा भारत फिरून प्रहार करणारा आहे तोही लगेच, अचूकपणे आणि अतिशय स्पष्टपणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सिद्धांत, भारताच्या आधुनिक देशांतर्गत संरक्षण उद्योगाची वाढती व्याप्ती आणि भारताच्या सशस्त्र दलांची व्यावसायिकता या सर्वांमधून हेच दिसते की भारत आता शेवटच्या युद्धाची नव्हे, तर पुढील युद्धाची तयारी करत आहे. या ऑपरेशनमधील विराम हा ऑपरेशन सिंदूरचा शेवट नाही. हा एक विराम आहे. भारताने पुढाकार घेतला आहे. जर पुन्हा चिथावणी दिली, तर पुन्हा हल्ला केला जाईल. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी भारताने जगाला एक नवीन मार्ग दाखवला आहे. हा एक नवीन सिद्धांत जगासमोर आला आहे. राष्ट्र-पुरस्कृत दहशतवादाच्या संकटाचा सामना करणाऱ्या सर्व राष्ट्रांनी याचा अभ्यास केला पाहिजे. ऑपेरेशन सिंदूर हे एक आधुनिक युद्ध आहे. आण्विक युद्धाच्या सावलीत, जागतिक स्तरावर लक्ष वेधून आणि मर्यादित वस्तुनिष्ठ चौकटीत लढले गेलेले आणि प्रत्येक बाबतीत महत्त्वाचे म्हणजे ते एक धोरणात्मक यश होते आणि एक निर्णायक भारतीय विजय होता.
लेखक : अर्बन वॉरफेअर इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक आहेत (ते अंडरस्टँडिंग अर्बन वॉरफेअर'चे सह-लेखकही आहेत)