Monday, May 12, 2025

ठाणे

ठाण्यात बांगलादेशी फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ

ठाण्यात बांगलादेशी फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ

घुसखोरांवर कारवाईची शिवसंस्कृती प्रतिष्ठानची मागणी


ठाणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा घुसखोरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बनावट आधारकार्ड व अन्य कागदपत्राचे पुरावे बनवून बांगलादेशी नागरिक ठाण्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत. याबाबत शिवसंस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी या घुसखोरांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत आमदार संजय केळकर आणि आमदार अॅड. निरंजन डावखरे यांच्या जनता दरबारात लेखी निवेदन दिले. त्यावेळी दत्ता घाडगे, मेघनाथ घरत, प्रफुल वाघोले आणि ओमकार चव्हाण उपस्थित होते.


ठाणे शहरात घुसखोर बांगलादेशी फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून अनेक बांधकामांच्या ठिकाणी सर्रास परप्रांतीय मजुरांचा राबता दिसून येत आहे. ठाणे शहरात त्यांच्या टोळ्या सक्रिय असून दर महिन्याला हजारो लोक शहरात घुसखोरी करीत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वास्तवाचा पुरावा नसताना सुद्धा बिनधास्तपणे शहरात अनेक ठिकाणी मासेविक्री, नारळपाणी विक्री, पंक्चरवाले, फळविक्री, अनेक प्रकारचे ज्यूस विक्री अनधिकृतपणे रस्त्याच्या बाजूला हातगाडी लावून करत आहेत.



या घुसखोरांमुळे सामाजिक सुरक्षा सुद्धा धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा घुसखोर बांगलादेशींवर त्वरित कारवाई करावी. अन्यथा, नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा दत्ता घाडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. भारतात बांग्लादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत आहे. सहज उपलब्ध होणार्या पॅनकार्ड व आधारकार्ड अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे हे घुसखोर राजरोसपणे वावरत आहेत.


कोणत्याही पोलीस व्हेरीफिकेशनशिवाय ही मंडळी बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत आहेत. काही महिन्यापूर्वी दत्ता घाडगे यांनी याबाबतच्या तक्रारी ठाण्यातील तसेच नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांसह सरकार दरबारी केल्या होत्या, तर आता ठाणे महापालिका आयुक्तांनाही निवेदन सादर केले असून पाच दिवसांत कारवाई करण्याचा अल्टीमेटम प्रशासनाला दिला आहे.

Comments
Add Comment