
पुणे: पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्याचा देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. भारतीय लष्कराने पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे दहशतवाद्यांचे ९ तळ उद्वस्त केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान संघर्षाला जोरदार सुरुवात झाली आहे. ज्यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. सोशल मिडियावर तर भारत-पाक हल्ल्यासंदर्भात अनेक माहिती दर मिनिटाला येताना दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर अनेक मीम्स आणि पोस्ट देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. पण, या दरम्यान देशविरुद्ध चिथावणीखोर (Anti National Provocative Posts) पोस्ट शेअर करण्याच्या दोन घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यामधील एक घटना पुण्याची तर दुसरी रायगड येथील आहे.
पुण्यात राहणाऱ्या खतीजा शहाबुद्दीन शेख या १९ वर्षीय तरुणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'पाकिस्तान जिंदाबाद' असे स्टेटस ठेवत भारताविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित तरूणीवर भारतीय न्यायसंहिता कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२, ३५३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, खतिजा ही सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होती. मात्र या प्रकारानंतर तिला महाविद्यालयाने काढून टाकले आहे. तर, रायगडमधील पेण येथील एका तरुणाला देखील देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पेण पोलिसांनी दखल घेतली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.