उत्तर प्रदेश: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने देशातील सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. तसेच, 48 तासांच्या आत देश सोडण्याचे निर्देशदेखील दिले. या निर्णयामुळे भारतात राहत असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना गाशा गुंडाळून घर वापसी करावी लागणार आहे. त्यामुळे, नेपाळमार्गे भारतात आलेल्या सीमा हैदर (Seema Haider)ला देखील पुन्हा पाकिस्तानला परतावं लागणार का? हा एक मुद्दा उपस्थित केला जात आहे.
पाकिस्तानी महिला सीमा हैदर आपल्या ३ मुलांना घेऊन नेपाळमार्गे भारतात येते काय आणि भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न करते काय, गेल्यावर्षी गाजलेल्या या प्रकरणाची आता पुन्हा एकदा नव्याने चर्चा होत आहे. सध्या सीमा हैदर उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात राहत असून, अलीकडेच तिने एका मुलीला जन्म दिला आहे. आता ती चार मुलांची आई आहे. मात्र, तिचा भूतकाळ पाहता ती मूळची पाकिस्तानी असल्याकारणामुळे तिला देखील इतर पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे आपल्या देशात परतावे लागणार असल्याची शक्यता जोर धरू लागली आहे. या संदर्भात सीमाच्या वकिलाने तातडीने महत्त्वाची माहिती दिली.
सीमाच्या वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती
सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सीमाचा खटला इतर पाकिस्तानी नागरिकांपेक्षा वेगळा आहे. सीमाची सर्व कागदपत्रे गृह मंत्रालय आणि एटीएसकडे जमा आहेत. तसेच त्यांची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. सीमाच्या वकिलाने असाही दावा केला की सीमा आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तान समर्थित घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, ज्यांच्याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या जात होत्या.
वकील एपी सिंह पुढे असे देखील म्हणाले की, सीमाला उत्तर प्रदेश कोर्टाकडून जामीन मिळाला आहे आणि ती सर्व कायदेशीर अटींचे पालन करत आहे. सीमा आश्रयाच्या आधारावर भारतात राहत आहे आणि तिला भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर पूर्ण विश्वास आहे.
सीमाला पाकिस्तानात परत पाठवण्याची पहिल्या पतीची मागणी
दरम्यान, या घटनेदरम्यान, सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो सीमाला पाकिस्तानात परत पाठवायला हवे असे म्हणत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी माझ्या मुलांसाठी आसुसलो आहे. भारत सरकारने माझ्या मुलांनाही पाकिस्तानात परत पाठवावे. जर तुम्ही सीमाला पाकिस्तानला पाठवू शकत नसाल तर तिला तिथे शिक्षा करा. तिला मदत करणारा, तिचा मानलेला भाऊ एपी सिंहला लाज वाटली पाहिजे.