जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

  73

श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात अनेक ठिकाणी हिमवृष्टी सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी गारा पडल्या तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारे, गारपीट, मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, निवडक ठिकाणी झालेली हिमवृष्टी यामुळे सामान्यांचे हाल होते आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात हिमवृष्टी सुरू आहे. सततच्या हिमवृष्टीमुळे गुरेझ-बांदीपोरा हा वाहतुकीच्यासाठी महत्त्वाचा असलेला रस्ता बंद केला आहे.



राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक रस्त्यांवर पावसाचा तडाखा बसल्यामुळे चिखल झाला आहे. वाहने चालवणे अशक्य झाले आहे. चालत प्रवास करणेही कठीण झाले आहे. सरकारने लोकांना जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून नाशरी आणि नवयुग बोगद्यादरम्यानचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. रामबनमध्ये जमीन खचल्यामुळे महामार्गाचे नुकसान झाले आहे. महामार्ग पुन्हा कार्यरत करण्यासाठी किमान ४८ तास लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने राज्यात अनेक ठिकाणी शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.



हवामान विभागाने सोमवारी २१ एप्रिल रोजी पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये गेल्या २४ तासांत १६.४ मिमी, बडगाममध्ये १८.० मिमी आणि कुपवाडामध्ये २०.० मिमी पावसाची नोंद झाली. कोकरनाग आणि पहलगाममध्ये अनुक्रमे ३३.२ मिमी आणि २७.८ मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर काश्मीरच्या उंच भागात वसलेल्या गुलमर्गमध्ये खोऱ्यातील सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस पडला आणि येथे शून्याखालील तापमान -०.८ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदले गेले.



लडाखमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. कारगिलमध्ये सर्वाधिक २६.५ सेमी हिमवृष्टी झाली. द्रास आणि पदुम दोन्ही ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टीची नोंद झाली. द्रासमध्ये ५ मिमी पाऊस आणि ५ सेमी हिमवृष्टी झाली. दुममध्ये ५ मिमी पाऊस आणि २ इंच (सुमारे ५ सेमी) हिमवृष्टी झाली. खलस्तेमध्ये ७.० सेमी आणि लेहमध्ये ०.५ सेमी हिमवृष्टी झाली.



वाहतूक पोलिसांनी परवाने देण्यासाठीच्या चाचण्या १९ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवल्याचे जाहीर केले आहे. चालकांना दिलेल्या टायमिंग स्लॉटच्या पावत्या जपून ठेवण्याचे आवाहन केले आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी वाहने कमी वेगाने पण दोन्ही बाजूंनी जात - येत आहेत. अवजड वाहनांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद आहे. चालकांना फक्त दिवसा गाड्या चालवा असेही निर्देश देण्यात आले आहेत. रामबन आणि बनिहाल येथे जमीन खचल्यामुळे महामर्गाचे तसेच आसपासच्या भागांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी तातडीने डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. चालकांना रस्त्यात अनावश्यक थांबे घेणे टाळा, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुघल रोड, सिंथन रोड आणि एसएसजी रोड बर्फ साचल्यामुळे बंद आहेत.



नागरिकांना महत्त्वाचे काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. अनेक ठिकाणी सोमवार २१ एप्रिल रोजी पुन्हा पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आठवड्याभरासाठी शेतीची कामं टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नद्यांच्या पाण्याच्या पातळीत एकदम वाढ झाली आहे. यामुळे राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे.
Comments
Add Comment

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली