Raj Thackeray : मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने राज ठाकरेंची पोस्ट Viral

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज म्हणजे सोमवार १४ एप्रिल २०२५ रोजी १३४ वी जयंती आहे. ही जयंती देशभर उत्साहाने साजरी होत आहे. मुंबईत वांद्रे - वरळी सागरी सेतूवर लेझर लायटिंग करण्यात आले आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, रोषणाई करण्यात आली. मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिक चैत्यभूमीवर पोहोचले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी एक एक्स पोस्ट केली आहे. ही पोस्ट व्हायरल होत आहे.



काय आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक्स पोस्ट ?



भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठिंबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं आवश्यक आहे.



संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचे सहकार्य मागितलं होतं. यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे केंद्र बनलं. या बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित असायचे.



स्वतः बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९४८ रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं या मागणीला पाठींबा देणारं निवेदन दिलं होतं. या निवेदनात मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे याचं विस्तृत विवेचन आहे. आणि हे विवेचन Maharashtra As A Linguistic Province मध्ये वाचता येईल.

हे सगळं सविस्तर सांगायचं कारण असं की बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ शकतो असे जे तर्क पुढे केले जात होते त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणं केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही.

पुढे बाबासाहेबांचं निधन झालं. पण त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांच्यासारखे नेते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने उतरले. बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवायांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मोरारजी देसाईंना जेरीस आणलं होतं.

पुढे १९६० ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचं योगदान हे विसरता येणार नाही.

आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ?

आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या युगपुरुषाला कोटी कोटी प्रणाम !

राज ठाकरे ।
Comments
Add Comment

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जान

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी,

नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे

गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक; हरित आणि इंधन बचतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार

इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेने विशेष कर्ज योजना आणावी - मंत्री नितेश राणे इलेक्ट्रिक बोटिंसाठी मुंबई बँक

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Water Shortage : राज्यातील १५ जिल्ह्यांत पाणीटंचाई

६३३ गावे, १ हजार ६५२ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू मुंबई : राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे

महाराष्ट्रात होणार २५ हजार ४०० मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती

६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी