Thane News : ठाणे जिल्ह्यात अवैध वसतिगृहातून २९ बालकांची सुटका

संचालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल


ठाणे : ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे 'पसायदान विकास संस्था' या नावाने चालविल्या जाणाऱ्या एका अनधिकृत बालकांच्या निवासी संस्थेतून जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत २९ बालकांची सुटका केली आहे. संस्थेत बालकांना जबर मारहाण तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्प लाईनवर प्राप्त झाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणी संस्थेचे संचालक, त्यांच्या पत्नी, मुलगा आणि त्यांना मदत करणारे दोन अशा एकूण पाच जणांविरुद्ध बाल न्याय अधिनियम २०१५ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल २०२५ रोजी चाईल्ड हेल्प लाईनवर खडवली येथील 'पसायदान विकास संस्था' बाबत तक्रार आली होती. तक्रारीमध्ये संस्थेत बालकांना शारीरिक मारहाण केली जात असून लैंगिक अत्याचार होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ११ एप्रिल रोजी पोलिसांना सोबत घेऊन संस्थेची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आणि बालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांना शारीरिक इजा पोहोचेल, अशा प्रकारे मारहाण तसेच अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.



या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संस्थेत असलेल्या २९ बालकांची सुटका केली. यामध्ये २० मुली आणि ९ मुलांचा समावेश आहे. सुटका केलेल्या सर्व बालकांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. समितीने रात्री उशिरापर्यंत या बालकांच्या देखरेखेबाबत आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण केली.


या प्रकरणी संस्थेचा संचालक बबन नारायण शिंदे, त्यांची पत्नी आशा बबन शिंदे, संचालक मुलगा प्रसन्न बबन शिंदे, त्यांना मदत करणारा प्रकाश सुरेश गुप्ता आणि दर्शना लक्ष्मण पंडित या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी खडवली येथील रहिवासी आहेत. सुटका करण्यात आलेल्या बालकांपैकी काही खडवली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते. त्यांची आगामी परीक्षा लक्षात घेता, शिक्षण विभागाने त्यांच्या परीक्षेसाठी विशेष व्यवस्था करावी, यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधण्यात येत आहे.


जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने या प्रकरणी तत्परतेने कार्यवाही केली असून, बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सर्व बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सध्या या बालकांना उल्हासनगर येथील मुलींचे विशेषगृह/बालगृह तसेच कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे शासकीय बालगृहात सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे.


या कारवाईनंतर जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांनी सांगितले की, "बालकांची सुरक्षितता आणि त्यांचे हित हे प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. बालकांच्या शोषणाबाबत आमची भूमिका 'झीरो टॉलरन्स'ची आहे आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन नेहमीच कटिबद्ध आहे. अशा गैरकृत्यांची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, जेणेकरून भविष्यात कोणीही बालकांच्या भविष्याशी खेळण्याचे धाडस करणार नाही."


जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, "आपल्या आसपास कोणत्याही स्वरूपाची बालकांसाठीची निवासी संस्था अनधिकृतपणे चालविली जात असल्यास किंवा बालकांचे शारीरिक, लैंगिक, मानसिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे शोषण होत असल्यास, तात्काळ १०९८ या चाईल्ड हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा. बालकांच्या अनधिकृत निवासी संस्था चालवणे आणि त्यांचे शोषण करणे हा बाल न्याय अधिनियमानुसार गंभीर गुन्हा आहे. याबाबत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे."

Comments
Add Comment

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेस मान्यता; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

भरतीची सविस्तर कार्यपद्धती जाहीर मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दोन्ही चिरंजीवांसह दिल्लीत मोदी-शहांच्या भेटीला - आधी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ‘चाय पे चर्चा’; तटकरेंनी फेटाळल्या विलिनीकरणाच्या चर्चा

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार : कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई : सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून, नियमावलीचा मसूदा तयार झाल्यानंतर कला

युरोपमध्ये रंगणार मराठी नाट्यकलेचा जागर

मुंबई : मराठी रंगभूमी ही महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेचा अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचा भाग आहे. भारतातील सर्वांत