मुंबई : लवकरच नवीन चौपदरी मुंबई-गोवा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. सध्या गोव्याला रस्त्याने जाण्यासाठी बारा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. हा वेळ नव्या चौपदरी मुंबई-गोवा महामार्गामुळे सहा तासांवर येणार आहे. यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. नव्या चौपदरी मुंबई-गोवा महामार्गाचे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन चौपदरी मुंबई-गोवा महामार्ग ४६६ किमी.चा आहे. या महामार्गावर एकूण ४१ बोगदे आणि २१ पूल आहेत. माणगाव, इंदापूर, पाली, लांजा, कोलाड आणि चिपळूण या गावात बायपास आणि पुलांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी काम पूर्ण झाले आहे किंवा अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्पाचा खर्च ७३०० कोटी रुपये आहे.
New York Helicoptor Crash : न्यू यॉर्कमध्ये हेलिकॉप्टर नदीत कोसळून ६ जणांचा मृत्यू
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) जेएनपीटीजवळील पागोटे (पनवेलकडे जाणारा एमटीएचएलचा लँडिंग पॉइंट) ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शनला जोडणारा ३० किमी लांबीचा एक्सप्रेसवे बांधण्यास सुरुवात करणार आहे. हा नवीन कॉरिडॉर उरण-चिरनेर महामार्ग, गोवा महामार्ग आणि पुणे द्रुतगती मार्ग या मार्गांवरून जाईल, ज्यामध्ये मार्गावर अनेक ठिकाणी एन्ट्री आणि एक्झिट पाँइट आहेत. महामार्गावर एकूण १४ ठिकाणांहून वाहनांना प्रवेश करता येणार आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या महामार्गामुळे मुंबई आणि गोवा यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसंच महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग प्रवासी आणि व्यापाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार आहे.
महामार्ग पनवेलपासून सुरू होऊन रत्नागिरीमार्गे जाणार आहे. या महामार्गाचा ८४ किमी. लांबीचा पनवेल-इंदापूर विभाग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)कडून विकसित करण्यात येत आहे. तर, उर्वरित भागाचे रुंदीकरण सार्वजनिक विभाग करत आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.