Ashwini Bidre Murder Case : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रेच्या आरोपीला २१ एप्रिलला मिळणार शिक्षा

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. अश्विनी बिद्रे हत्येप्रकरणात पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आलं आहे. लिव-इन पार्टनर अश्विनी बिद्रेची हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे करणे आणि त्यांची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करणे असे आरोप कुरुंदकरवर होते. न्यायालयाने कुरुंदकर आणि त्याच्या दोन साथीदारांना दोषी ठरवले आहे. दोषींच्या शिक्षेचा निर्णय न्यायालय २१ एप्रिल रोजी जाहीर करणार आहे. पनवेल सत्र न्यायालय निर्णय देणार आहे.



काय आहे नेमकं प्रकरण ?


अभय कुरुंदकर हे मुंबई पोलिसांच्या ताफ्यातील नावाजलेलं नाव होत. त्यांना राष्ट्रपती पदक सुद्धा मिळालं होतं. कुरुंदकर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अश्विनी बिद्रेच्या प्रेमात पडले. पण २००५ साली अश्विनी बिद्रेचं लग्न राजू गोरे नावाच्या व्यक्तीशी झालं. लग्नाच्या दोन वर्षांनी तिने महाराष्ट्र पीएससी उत्तीर्ण केली आणि पोलिसात सब-इन्स्पेक्टर झाली. तिचं पहिलं पोस्टिंग पुण्यात झालं. तीन वर्षांनंतर, अश्विनीची सांगलीला बदली झाली.


अश्विनीची हत्या झाली तेव्हा तिची मुलगी अवघ्या ६ वर्षांची होती. अश्विनीची पोस्टिंग रत्नागिरी येथे २०१३ मध्ये झाली. कुरुंदकरचे लग्न झालेले असूनसुद्धा तो अश्विनीसोबत लिव-इन पार्टनर म्हणून राहत होता. दोघांच्याही घरी याची कल्पना होती. अश्विनी २०१४ मध्ये तिच्या पतीपासून वेगळी झाली. मात्र अभयच्या घरी या घडामोडीची माहिती नव्हती.



अभय आणि अश्विनी नवी मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. अश्विनीला २०१५ मध्ये बढती मिळाली आणि ती सहाय्यक पोलिस निरीक्षक बनली. बढती झाल्यानंतर ती ११ एप्रिल २०१६ रोजी बेपत्ता झाली. अश्विनीच्या भावाला आनंदला १५ एप्रिल रोजी फोनवर मेसेज आला की ती काही कामासाठी उत्तर प्रदेशला जात आहे आणि एका आठवड्यानंतर परत येईल. मेसेज आल्यामुळे अश्विनीच्या घरचे निवांत होते. मात्र एक दिवस अचानक अश्विनीच्या वडिलांना नवी मुंबई पोलिस मुख्यालयातून मोबाईलवर फोन आला आणि त्यांच्याकडे अश्विनीबद्दल चौकशी करण्यात आली.


अश्विनी दोन महिन्यांपासून कामावर आली नाही, असे त्यांना सांगण्यात आलं. पण कोल्हापुरात राहणाऱ्या अश्विनीच्या कुटुंबाला याबद्दल काहीच माहिती नव्हते. यानंतर अश्विनीचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना अभय आणि अश्विनी यांच्या नात्याबद्दल स्पष्टता मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अभयची चौकशी केली पण त्यांना काहीच सापडले नाही. काही दिवसांनी तपासादरम्यान पोलिसांना अश्विनीच्या लॅपटॉपमधून काही पुरावे सापडले ज्यावरून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. पोलिसांना लॅपटॉपमध्ये एक व्हिडिओही सापडला ज्यामध्ये अभय अश्विनीला मारहाण करताना दिसला होता. तब्बल १० महिन्यांच्या तपासानंतर अभयने शरणागती पत्करली आणि अश्विनीचा खून केल्याची कबुली दिली.


अश्विनी आपल्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, असे अभयने पोलिसांना सांगितलं. पण आपली इमेज जपण्यासाठी अभय हा त्याची पत्नी आणि मुलांना सोडण्यास तयार नव्हता. याच मुद्यावरून झालेल्या भांडणादरम्यान अभयने अश्विनीचा खून केला. कुऱ्हाडीने तिचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकून दिले असल्याचं कबुल केलं. या घटनेनंतर अश्विनीच्या कुटुंबाने आणि तिच्या मुलीने आईला न्याय मिळावा यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले. तब्बल ९ वर्षांनी न्यायालयीन लढाईत त्यांना यश मिळालं आहे. अश्विनीच्या मारेकऱ्याला आणि त्याच्या दोन साथीदारांना पनवेल न्यायालयाने दोषी ठरवले आहे.



न्यायालयात आतापर्यंत काय घडले ?


हत्येत पीआय अभय कुरुंदकर यांचा सहभाग असल्याचं समोर आलं. पनवेल सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान, अभय कुरुंदकर हेच दोषी असल्याचं आढळून आल्याने न्यायालयाने अभय कुरुंदकर यांना मुख्य दोषी ठरवलं. तसेच हत्येत सहभागी असलेल्या महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांनाही न्यायालयाने दोषी ठरवलंय. तर कुरुंदकर यांचा वाहनचालक राजेश पाटीलला मात्र न्यायालयाने दिलासा दिला असून पुराव्या अभावी त्याची निर्दोष मुक्तता केलीयं.
Comments
Add Comment

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह