म्यानमारमध्ये शुक्रवारी महाभयंकर भूकंप झाला आणि अक्षरशः हजारो नागरिक ठार झाले. प्राणहानी झाली आणि कित्येक जायबंदी झाले. आता म्यानमार उद्ध्वस्त झाले आहे आणि या गरीब देशापुढे दुसरा काहीही इलाज नाही. १६०० हून अधिक लोक या भूकंपात ठार झाले. हा आतापर्यंतचा सर्वात भीषण असा भूकंप होता आणि या परिसराला गेल्या कित्येक वर्षांत असा प्रलयकारी भूकंपाने तडाखा दिला नव्हता. शुक्रवारी मात्र या भूकंपाने म्यानमारसारख्या गरीब देशाला इतका जबरदस्त तडाखा दिला की, भूकंपाचे केंद्रबिंदू जरी मंडाले असल्याचे सांगितले जात असले तरीही त्याची व्याप्ती बँकॉकपर्यंत पसरली होती आणि व्हिएतनाम ते भारतातील काही ठिकाणीही भूकंपाचा हादरा जाणवला असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
७.७ रिक्टर स्केल इतका तीव्रतेचा हा भूकंप होता आणि त्याचे दक्षिण आशिया प्रांतातील हा अलीकडच्या काळातील सर्वात भीषण असा भूकंप आहे असे काहींचे म्हणणे आहे. गेल्या शतकातील काही वर्षांतील हा सर्वात भीषण असा भूकंप होता असेही काही जणांचे म्हणणे आहे. भूकंपाची तीव्रता इतकी भयंकर होती की, तिचे पडसाद शेजारच्या थायलंडपर्यंत पोहोचले आणि अनेक इमारती कोसळल्या आणि कित्येक लोक जखमी झाले. थायलंडमध्येही कित्येक इमारती या भूकंपाने हादरल्या. खुद्द म्यानमारमध्ये कित्येक इमारती कोसळल्या आणि अनेक हवाईतळ उद्ध्वस्त झाले तसेच अनेक पूल कोसळले. मंडाले जे आपल्याला लोकमान्य टिळक यांनी गीतारहस्य लिहिला यासाठी माहीत आहे ते मंडाले शहर या भूकंपाचे केंद्रबिंदू होते. अनेक टॉवर्स कोसळले आणि अनेक लोक ठार झाले. म्यानमार हा अत्यंत गरीब देश आहे आणि त्याचे पर कॅपिटा उत्पन्न अत्यंत कमी म्हणजे आपल्यापेक्षा फारच कमी आहे. त्या देशाला हे नुकसान सोसणार नाही हे उघड आहे. त्यामुळे जग त्याच्या मदतीसाठी धावून आले आहे. पण म्यानमारमध्ये लष्करी राजवट सरकार आहे आणि ते सरकार अत्यंत निर्दयी आहे. त्यामुळे लोक असहाय्य आहेत आणि सरकार इतर देशाकडे मदतीसाठी डोळे लावून आहे.
केवळ म्यानमारच्या नव्हे, तर बँकॉक, चीनचे काही भाग, लाओस आणि बांगलादेश आणि भारतातही काही भागांत या भूकंपाची व्याप्ती पसरली होती. आता म्यानमार सरकारपुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते वाचलेल्या म्यानमारवासीयांना मदत देण्याचे आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे. हे आव्हान खूप मोठे आहे आणि ते अवघड आहे. या भूकंपात सॅगेग पूल आणि एयेयावडी नदीवरील पूल कोसळला आणि काही लोक त्यात जखमी झाले. आता म्यानमार सरकारपुढे आव्हान आहे ते जखमींना रुग्णालयीन मदत मिळवून देण्याचे आणि त्यांच्यासाठी औषधे आणि इतर वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे. कित्येक रुग्णांना रक्ताची कमी आहे आणि त्याचे रक्त गट तपासून रक्त पुरवण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. हे सरकार काही इतर प्रगत देशासारखे नाही, त्यामुळे या सरकारला अनेक गोष्टी कशा कराव्या ते माहितीही नाही. त्यामुळे देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सरकारने सांगितले आहे की, आम्ही भूकंपाच्या कारणांची चौकशी तातडीने करणार आहोत. तसेच अत्यंत जलदीने मदत आणि पुनर्वसन कार्याची अंमलबजावणी केली जाईल. लोकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी सरकारला सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. म्यानमार हा नेहमीच भूकंपाने ग्रस्त होणारा देश आहे आणि वारंवार का भूकंप का होतात याची कारणमीमांसाही करण्यात आली आहे. म्यानमार हा देश भारत आणि युरेशियन प्लेटसच्या अध्यात वसला आहे. त्यामुळे त्या वारंवार सरकत असतात आणि त्यात त्याच्या सरकण्यामुळेच असे भूकंप येत असतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
म्यानमारचा ताजा भूकंप हा इतका जोरदार होता की त्याचे हादरे चीन, बँकॉक आणि कंबोडियाला जाणवले. १९३० पासूनच म्यानमारला अनेक भूकंपाने तडाखा दिलेला आहे. त्यात कित्येक हजारो लोक पूर्वी ठार झाले आहेत. आता तर १६०२ लोक भूकंपाने ठार झाले आणि हा आकडा सर्वात जास्त आहे. नागरी युद्धाने होरपळलेल्या या देशात आता भूकंपाने अनेकदा तडाखे दिले आहेत आणि त्याचे कारण आहे ते म्हणजे पृथ्वीचे वरचे वातावरण जे सरकले आहे ज्याला आम्ही भूकंप म्हणतो. टेक्टोनिक प्लेट्समध्ये असल्याने म्यानमारमध्ये वारंवार भूकंप होतात असे कारण निदर्शनास आले आहे. असे असले तरीही लष्करी राजवट सरकार आपल्या हवाई हल्ल्यांपासून हटलेले नाही आणि त्याने ते सुरूच ठेवले आहेत. जेथे भूकंप झाला तेथेही लष्करी सरकारने बॉम्ब हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यावरून त्या देशाची अवस्था किती रसातळाला गेली आहे हे जाणवते. आता संयुक्त राष्ट्रसंघाने हे हल्ले म्हणजे संपूर्ण अत्याचारी आणि अस्वीकारार्ह आहेत असे म्हटले आहे. पण त्यातून म्यानमारीयन सरकारची वृत्ती दिसून येते. म्यानमारच्या लष्करी सरकारवर कुणीही किती दबाव आणण्यास सक्षम असेल, तर त्याने प्रथम तेथील सरकारला बॉम्बहल्ले थांबवून शांतता प्रयत्न करण्यास सांगितले पाहिजे अशी जगाची अपेक्षा आहे. भारताने आपले कर्तव्य केले आहे आणि मदत पाठवून दिली आहे. मोदी यांनी पंतप्रधान मिन आँग यांच्याशी बोलणे केले आहे आणि त्यांना सर्व प्रकारची मदत देण्याची खात्री दिली आहे. भारताच्या गरीब राष्ट्रांना मदत या वचनानुसार मोदी यांनी आपले काम केले आहे. त्यामुळे मोदी यांचे म्यानमारने आभार मानले आहेत. मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करणे हे योग्य आहे. पण म्यानमार सरकारचे हे वर्तन दुटप्पी आहे.