विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची ग्वाही
पुणे : राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्याचे राज्य शासनाचे धोरण असून जिल्ह्यामध्ये अधिकाधिक आणि विविध क्षेत्रातील उद्योग यावेत, यासाठी प्रशासनातर्फे निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध प्रशासकीय विभागांनी सामूहिक दृष्टिकोन ठेवून एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसोबत उद्योजकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Pimpri News : थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा बडगा
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीने उद्योगांना सर्व ते सहकार्य तसेच सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. त्यासाठी उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने दर दोन महिन्याला बैठक आयोजित करण्यात येत आहे. या बैठकीत उद्योजकांनी मांडलेल्या समस्या, अडचणींवर चर्चा केली जात असून संबंधित विभागांनी पुढील बैठकीपूर्वी त्यावर कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
उद्योगांना वीज, पाणी, रस्ते आदी पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्राधान्याने द्याव्यात. त्यासाठी प्रस्ताव मंजुरी, निधीबाबतचे शासनाच्या पातळीवरील मंजुरीचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. पुणे शहरातील एकात्मिक वाहतूक आराखडा मंजुरीच्या टप्प्यात असून मंजुरीनंतर लवकरच कार्यवाहीला सुरुवात होईल. पुणे बाह्यवळण मार्गालाही गती देण्यात आली असून येत्या दोन वर्षांत हा मार्ग पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.
वाहतुकीच्या अनुषंगाने आवश्यक वेळ पाहता तत्काळ करण्यासारख्या उपाययोजना हाती घेऊन उद्योगांना वाहतूक कोंडीपासून दिलासा द्यावा, असेही ते म्हणाले. बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, माथाडी कामगार मंडळ, कामगार विभाग, पोलिस, जिल्हा परिषद आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.