रेडी रेकनरमध्ये १० ते १५ टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा निराधार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये काही भागांमध्ये रेडी रेकनर दर वाढले, तर काही ठिकाणी दर स्थिर ठेवण्यात आले. 2023-24 आणि 2024-25 मध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही. काही माध्यमांमध्ये 10-15 टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, त्या निराधार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत सांगितले.


विधानपरिषद सदस्य सर्वश्री सुनील शिंदे, ॲड.अनिल परब, सचिन अहिर यांनी मालमत्तांच्या खरेदी विक्री वेळी जमा होणाऱ्या मुद्रांक शुल्क संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.


राज्याच्या कोणत्याही भागात तडकाफडकी दरवाढ करण्याचा शासनाचा कोणताही हेतू नसून राज्यात दर ठरवताना स्थानिक परिस्थिती, विकास दर आणि मागणी-पुरवठा यासारख्या घटकांचा विचार केला जातो. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे, ज्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दर निश्चित करतात. यामध्ये गरजेनुसार काही दर कमी करण्याचा विचारही केला जातो, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.


मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारची संपत्ती असून, हाय-राईज इमारती, एसआरए प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांच्यात मोठा फरक आहे. त्यामुळे प्रत्येक भागासाठी स्वतंत्र ‘व्हॅल्यू झोन’ ठरवले जातात. रेडी रेकनर दर ठरविताना गरीब आणि मध्यमवर्गीयांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाणार असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.


यासंदर्भात राज्य सरकार जनतेच्या तक्रारी आणि सूचना गांभीर्याने घेत असून, 9 जानेवारी 2025 रोजी या संदर्भात बैठक झाली आहे. तसेच, 1 एप्रिलपूर्वी जर कोणालाही काही सूचना द्यायच्या असतील, तर त्या सरकारकडे मांडाव्यात, असे आवाहन सुद्धा मंत्री श्री.बावनकुळे यांनी केले. शासन कोणत्याही भागात अवाजवी दरवाढ करणार नाही, तसेच गरज असल्यास काही दर कमी करण्याचाही विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१