काठमांडू : भारताच्या शेजारी असलेल्या आणि २००८ पर्यंत हिंदू राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमध्ये सध्या माओवादी कम्युनिस्टांची सत्ता आहे. या सत्ताधाऱ्यांविरोधात नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे. बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. नेपाळमध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याला निमित्त आहे ते ताज्या घटनाक्रमाचे…
माओवादी सत्तेत आल्यानंतर राजधानी काठमांडूतून बाहेर जाऊन स्थायिक झालेले नेपाळचे शेवटचे राजे ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव पुन्हा एकदा काठमांडूत आले आहेत. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळ हजारो तरुणांनी राजाचे स्वागत केले. याप्रसंगी ‘नारायणहिटी खाली गर, हाम्रो राजा आउंदै छन’ आणि ‘जय पशुपतिनाथ, हाम्रो राजालाई स्वागत छ’ या दोन नेपाळी भाषेतील घोषणा वारंवार देण्यात आल्या. नारायणहिटी हे नेपाळच्या राजवाड्याचे नाव आहे. नेपाळी तरुण सरकारला उद्देशून राजवाडा रिकामा करा, महाराज येत आहेत आणि जय पशुपतीनाथ, आमच्या महाराजांचे स्वागत आहे अशा घोषणा देत होते.
मागील दोन महिने ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव हे पोखरा या पर्यटनस्थळी होते. तिथे त्यांनी अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. नागरिकांशी थेट संवाद साधला. ज्ञानेंद्र यांच्या या दौऱ्यातून त्यांनी नेपाळच्या राजकारणात सक्रीय होत असल्याचा स्पष्ट संकते दिला. आता ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव काठमांडूत येताच ‘राजवाडा रिकामा करा, महाराज येत आहेत’ अशी घोषणा तरुण देऊ लागले आहेत. यामुळे नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही येणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
Pakistan Train Hijack: पाकिस्तानी सैन्याकडून १०४ ओलिसांची सुटका, BLA ने केला ३० जवान मारल्याचा दावा
नेपाळच्या संसदेत १४ सदस्य असलेल्या राष्ट्रीय प्रजातांत्रिक पार्टीने जाहीरपणे ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव यांना पाठिंबा दिला आहे. तर एखाद्या पक्षाचे वेगळे मत असू शकते पण नेपाळमध्ये राजेशाही ही इतिहासजमा झाली आहे आणि पुन्हा येणार नाही, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
नेपाळमध्ये राजेशाहीची अखेर २००८ मध्ये झाली. राजेशाही संपल्यापासून नेपाळमध्ये आतापर्यंत १३ वेळा सत्तांतर झाले. पण अद्याप देशात स्थैर्य आलेले नाही. याउलट नेपाळमध्ये राजेशाही सलग २४० वर्षे कार्यरत होती. यामुळे राजकीय स्थैर्यासाठी नेपाळची तरुणाई पुन्हा एकदा राजेशाहीची मागणी करू लागली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०२४ मध्ये ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव भूतानच्या दौऱ्यावर गेले होते. महाराज नसूनही त्यावेळी भूतानमध्ये ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव यांच्यासाठी सगळीकडे लाल गालिचा अंथरण्यात आला होता. यानंतर फेब्रुवारी महिन्यात एक व्हिडीओ करुन ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव नेपाळमधील अस्थिरतेविषयी चिंता व्यक्त केली होती. देशाच्या प्रगतीसाठी स्थिर सत्तेची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली होती. यानंतर आता मार्च महिन्यात ज्ञानेंद्र बीर बिक्रम शाह देव यांचे काठमांडूत आगमन होताच तरुणांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे चित्र आहे.