ठाणे : होलिकोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना रंगांची उधळण करण्यासाठी विविध रंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र बाजारात मिळणाऱ्या रासायनिक अथवा विषारी द्रव्यांनी तयार केलेले रंग आरोग्यासाठी घातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रंगामुळे डोळ्यांना इजा, त्वचा विकार, अथवा शरीरात गेल्यावर धोकेदायक ठरतो. त्यामुळे पान,फुल,माती आदी नैसर्गिक रंगांची होळी खेळण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी केले आहे.
होळीची धामधुमीचा फीवर आता चांगलाच तापला असून,गल्लीबोळात उत्सवाची माहोल बघायला मिळतो आहे.बच्चे कंपनी आत्तापासूनच धमाल करताना दिसून येत आहेत. मात्र, ही धमाल अंगाशी येणार नाही ना याची काळजी घेणे आवश्यक आहे.अंगावर पाणी उडवून रंग लावण्याचे प्रकार ठिकठिकाणी बघायला मिळत असले तरी,या रंगात रासायनिक रंग अपायकारक ठरतो.कृत्रिम किंवा अजैविक रंग हे ॲल्युमिनियम, पारा, मोरचूद, जस्त, ऍसबेसटॉस, कथिल, क्रोमियम, कॅडमियम वगैरे धातूंपासून बनवलेले असतात.रासायनिक अथवा विषारी रंगांची उधळण केल्याव त्वचेला जळजळ होणे, अंगावर पुरळ येणे, लाल होणे, खाज येणे असा त्रास होऊ शकतो. या सोबतच रंगाची पूड जर खरखरीत असेल तर त्वचेवर ओरखडे ही उठू शकतात. डोळ्यांना जळजळ होऊन रंगामुळे डोळ्यांना गंभीर इजा होण्याचा धोका असतो.