मुंबई : मराठवाड्याच्या छोट्या भागातून आलेल्या आणि त्यावेळी मराठवाड्यात महिलांसाठी मर्यादित क्षेत्रे असताना जयदेवी स्वामी पुजारी यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशस्वीही झाल्या. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारितेही शिक्षण घेतले होते.यूपीएससीच्या माध्यमातून माहिती सेवेत आयआयएसमध्ये येण्यापूर्वी जयदेवी यांनी अनेक मासिकांत उपसंपादक पदाची धुरा सांभाळली आहे. यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून माहिती सेवा केडरच्या अधिकारी बनल्या. सुरूवातीची काही वर्ष त्यांना गावोगावी हिंडून शासनाने निवडून दिलेले जनजागृतीचे सिनेमे, छोट्या नाटिका तसेच जाहिराती दाखवाव्या लागत असतं. त्यानंतर त्यांची बदली आकाशवाणीवर झाली. नाशिक येथे वृत्तसंपादक आणि वृत्त विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. सध्या त्या भारतीय माहिती सेवा केडरच्या अधिकारी असून पत्रसूचना कार्यालय, मुंबई येथे उपसंचालक पदावर कार्यरत आहेत.
जयदेवी यांना आपले काम प्रचंड आवडते पण त्यात आलेले अनुभव हे खूप भयंकर होते. मी जेव्हा कार्यरत होते तेव्हा महिला या मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात काम करत नसे. तसेच या क्षेत्रात काम करताना अनेक वेळा जनजागृती करण्यासाठी एका गावाहुन दुसऱ्या गावी जावे लागत असे. त्यामुळे पूर्ण दिवस हा कामात आणि प्रवासात जायचा. त्याचबरोबर त्यावेळेस रात्रीच्या वेळेस राहण्याकरिता फारसी सोय नसल्याने असेल त्या ठिकाणी म्हणजेच एखादी शाळा, तेथील शासकीय निवासस्थानात राहून अंथरूण-पांघरूणापासून गरजेच्या सगळ्या गोष्टी घेऊन सतत फिरावे लागे. आकाशवाणीत काम करत असताना, बातमीची विश्वासार्हता जपण्यासाठी त्यांना अक्षरक्ष: झगडावे लागे. कधीकधी यासाठी वरिष्ठांचा रोषही स्वीकारावा लागत असे. अनेकदा हातात बातमी असूनही जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत ती बातमी प्रसिद्ध करता येत नाही. आज प्रत्येक वृत्तपत्र, वाहिन्या, रेडिओ, प्रसारमाध्यमे बातमीच्या विश्वासार्हतेसाठी पत्रसूचना कार्यालयावर अवलंबून असते. अशावेळी उपसंचालक पदाची धुरा वाहताना जयदेवी यांची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढते. त्यांचे काम किती कठीण व खडतर आहे याचा प्रत्यय आपल्याला येत राहतो.
जयदेवी यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की, बरेचवेळा केंद्राकडून येणारा सगळा मजकूर हा हिंदी किंवा इंग्रजी भाषेत असतो. आपण मराठीसाठी काम करत असल्यामुळे पूर्ण मराठीत भाषांतर करावे लागते. शासकीय सेवेत असलेल्या प्रत्येकाला २४ तास काम करावे लागते. त्यामुळे कधीकधी रात्री अपरात्री उठून सुद्धा त्यांना कामाला बसावे लागते. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवते की शासकीय माहिती विभागाचे काम सोपे नसते. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून, पडताळणी करून मगच त्याला न्याय द्यावा लागतो. जयदेवी यांचे काम नक्कीच सोपे नाही. आज खासगी वाहिन्या, वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे पटापट बातम्या करत असताना स्वत:कडे बातमी असूनसुद्धा प्रसारित करता येत नाही यावेळी कधीकधी खंतही वाटत असेल. शासकीय सेवेत असताना माहिती व प्रसारण अंतर्गत जो काही मजकूर येईल त्याची पडताळणी करून तो त्या त्या माध्यमाद्वारे प्रसारित करण्याचे काम जयदेवी आणि त्यांची टीम करत असते. अनेकवेळा पंतप्रधानांनाकडून, सचिवांकडून, मंत्रालयाकडून येणारे लेखही त्यांना छापावे लागतात. त्याचप्रमाणे शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या मासिकांची, पाक्षिक आणि साप्ताहिकांची जबाबदारीही त्यांना घ्यावी लागते. जयदेवी यांच्या कठीण कामाचा सन्मान करत प्रहार परिवाराकडून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.