१५ गावपाड्यांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
ठाणे : धरणांच्या तालुक्यात रणरणत्या उन्हात तप्त जमिनीवरून डोंगरदऱ्यातून काट्याकुट्यातून वाट काढत टंचाईग्रस्त भागातील महिला भगिनींची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. तब्बल तीनशे कोटींची भावली पाणी योजना मुदतीत पूर्ण न झाल्याने शहापूर तालुक्यातील महिला भगिनींच्या नशिबी यंदाही पाण्यासाठी पायपीट सुरूच राहिली आहे.
बोअरवेल, विहिरी कोरड्याठाक पडल्या असून परिसरातील पाण्याचे स्रोत आटल्याने महिला भगिनींना टँकरची चातकासारखी वाट बघावी लागत आहे. दिवसागणिक पाणीटंचाई गावपाड्यांमध्ये वाढ होत असून, यंदा ८२ गावे आणि २६२ पाडे अशा एकूण ३४४ गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार असून त्यासाठी किमान साडेचार कोटी खर्च अपेक्षित आहे.आजमितीस शहापूर तालुक्यातील १५ गावपाड्यांना १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून,नऊ गावपाड्यांनी टँकरची मागणी केली आहे.
मुंबई-ठाणे या मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारी तानसा, भातसा, मोडकसागर ही धरणे शहापूर तालुक्यात असताना या तालुक्यातील महिला भगिनींना पाणीटंचाई चा प्रचंड सामना करावा लागत आहे.गेल्यावर्षी १९८ गावपाड्यांसाठी ४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून, त्यासाठी तब्बल दोन कोटी ८० लाख खर्च झाला आहे. तर यंदा टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये कमालीची वाढ झाली असून साडेचार कोटी खर्च अपेक्षित आहे. टंचाईग्रस्त भागातील महिला भगिनींच्या डोक्यावरील हंडा खाली उतरावा यासाठी तब्बल तीनशे कोटींची गुरुत्वाकर्षणावर आधारित भावली पाणी योजना राबवण्यात येत आहे. २०२४ अखेरपर्यंत भावली पाणी योजना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, गोगलगायीच्या गतीने सुरू असलेल्या या योजनेच्या कामामुळे यंदा किमान साडेचार कोटी खर्च करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील दांड, उंबरखांड, कोथळे, आटगाव, साकडबाव या गावांसह नारळवाडी, राईचीवाड, उठावा, कोळीपाडा, सावरदेव, गोकुळनगर, पारधवाडी आदी १५ गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर कोठारे ग्रामपंचायत हद्दीतील तसेच वेहलोंढे, शिरगाव, फुगाळे,कळमगाव,उमरावणे या नऊ गावपाड्यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.