Friday, June 20, 2025

न्यूझीलंडपुढे २५० धावांचे आव्हान

न्यूझीलंडपुढे २५० धावांचे आव्हान
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील शेवटच्या साखळी सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने प्रभावी गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय फलंदाजांना वेसण घातली. यामुळे भारतीय संघ ५० षटकांत नऊ बाद २४९ धावा करू शकला. श्रेयस अय्यरने सर्वाधिक ७९, हार्दिक पांड्याने ४५ आणि अक्षर पटेलने ४२ धावा केल्या. शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आघाडीचे फलंदाज अवघ्या ३० धावांत बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला. याचा फटका भारतीय संघाला बसला. याआधी भारत सलग १३ व्यांदा नाणेफेक हरला. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया सलग दहाव्यांदा नाणेफेक हरली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतासाठी घातक ठरला.



शुभमन गिल दोन धावा करुन मॅट हेन्रीच्या चेंडूवर पायचीत झाला. रोहित शर्मा १५ धावा करुन जेमीसनच्या चेंडूवर विल यंगकडे झेल देऊन परतला. विराट कोहली ११ धावा करुन मॅट हेन्रीच्या चेंडूवर ग्रेन फिलिप्सकडे झेल देऊन परतला. अक्षर पटेल ४२ धावा करुन रचिन रविंद्रच्या चेंडूवर विल्यमसनकडे झेल देत तंबूत गेला. श्रेयस अय्यर ७९ धावा केल्यानंतर विल्यम ओरोर्कच्या चेंडूवर झेलबाद झाला. विल यंगने हा झेल घेतला. यष्टीरक्ष फलंदाज केएल राहुल २३ धावा करुन सँटनरच्या चेंडूवर लॅथमकडे झेल देऊन परतला. रविंद्र जडेजा १६ धावा केल्यावर मॅट हेन्रीच्या चेंडूवर विल्यमसनकडे झेल देऊन बाद झाला. हार्दिक पांड्याने ४५ धावा केल्या. तो मॅट हेन्रीच्या चेंडूवर रचिन रविंद्रकडे झेल देऊन तंबूत परतला. मोहम्मद शमी पाच धावा केल्यानंतर मॅट हेन्रीच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सकडे झेल देऊन बाद झाला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक पाच बळी घेतले. के. जेमीसन, विल्यम ओरोर्क, मिचेल सँटनर (कर्णधार) आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.



भारतीय संघ ५० षटकांत नऊ बाद २४९ धावा करू शकल्यामुळे न्यूझीलंडपुढे ५० षटकांत २५० धावा करण्याचे आव्हान आहे. भारत - न्यूझीलंड सामन्यातील विजेता संघ ऑस्ट्रेलिया विरोधात आणि पराभूत संघ दक्षिण आफ्रिकेविरोधात उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रविवार ९ मार्च रोजी होणार आहे.
Comments
Add Comment