Monday, June 9, 2025

‘मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला’: शरद पवार

‘मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला’: शरद पवार

नवी दिल्ली : ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन शुक्रवारी पार पडलं. शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ‘केवळ महाराष्ट्र नाही तर मराठी माणसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. नोकरी कामाच्या निमित्ताने अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यात दिसतात. मराठी साहित्याचा अद्भूत अनुभव घेण्यासाठी आपण इथे जमलो याचा मला मनापासून आनंद आहे’, अशा शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


याच भाषणात पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. नरेंद्र मोदी यांना संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी आपण गेलो तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपण कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं आश्वासन दिलं, असं शरद पवार यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. या सारस्वतांच्या महामेळाव्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहिले याचा मला मनापासून आनंद आहे, असेही ही पवार यावेळी म्हणाले.



दरम्यान, अखिल साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदींच्या हस्ते दीप प्रज्वलन केलं जाणार होतं. यावेळी मोदींनी शरद पवारांना पुढे बोलवून त्यांचा हात धरून दीप प्रज्वलन केलं. त्यानंतर दोन्ही नेते व्यासपीठावर शेजारी बसले, यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. तर पवार यांचं भाषण संपल्यानंतर ते पुन्हा आपल्याजागी बसण्यासाठी परतले. यावेळी पवारांना बसण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खुर्ची पुढे केली. त्यानंतर टेबलावरील बॉटलमधील पाणी ग्लासात ओतून पवारांना पाणी पिण्यासाठी ग्लास पुढे केला, या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या.

Comments
Add Comment