दुबई: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर विजय मिळवला आहे. बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी केवळ २२९ धावांचे सोपे आव्हान ठेवले होते. मात्र हे लक्ष्य गाठता गाठता भारताला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. अखेर भारताने बांगलादेशवर सहा विकेट राखत विजय मिळवला.
भारताला विजय मिळवून देण्यात शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली शानदार शतक झळकावले. शुभमनने १२५ बॉलमध्ये शतकी खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि २ षटकार ठोकले. तर सलामीवीर रोहित शर्माने ४१ धावा तडकावल्या. त्याने जोरदार सुरूवात करून दिली. मात्र तस्कीन अहदमने माघारी धाडले. विराट कोहलीलाही खास कामगिरी करता आली नाही. त्याने २२ धावा केल्या. तर श्रेयस अय्यर १५ धावा करून परतला.
तत्पूर्वी, बांगलादेशच्या तौविद हृदॉयने ठोकलेल्या १०० धावांच्या जोरावर बांगलादेशला २०० धावांचा टप्पा पार करता आला होता. त्याला जाकर अलीने चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला होता. झाकरने ६८ धावा केल्या. बांगलादेशचे इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अखेर बांगलादेशला ५० षटकांत केवळ २२८ धावा करता आल्या.
रोहित शर्माच्या ११ हजार धावा पूर्ण
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नवा इतिहास रचला आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
रोहितला इथवर पोहोचण्यासाठी १२ धावांची गरज होती. त्याने आपले हे लक्ष्य बांगलदेशविरुद्धच्या सामन्यात सहज पूर्ण केले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहितने ३६ बॉलवर ४१ धावा केल्या. यात ७ चौकारांचा समावेश होता.