Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजठाणेमहत्वाची बातमी

Kalyan - Dombivli News : कल्याण डोंबिवलीत होणार भविष्यातील तिसरी मुंबई

Kalyan - Dombivli News : कल्याण डोंबिवलीत होणार भविष्यातील तिसरी मुंबई

कल्याण : कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची समोर आली बातमी आहे. आता कल्याण डोंबिवलीतही भविष्यातील तिसरी मुंबई होणार आहे. आधी मुंबई त्यानंतर नवी मुंबईप्रमाणे आता तिसरी मुंबई जर कुठे होणार असेल तर कल्याण डोंबिवलीत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत त्यादृष्टीने अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आपण काम करत असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभेच्या माणगाव तलाव सुशोभीकरणाच्या भूमीपूजन समारंभात ते बोलत होते. गुलाब वझे आणि दत्ता वझे यांच्या मागणीनुसार सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीतून माणगाव तलावाचे नूतनीकरण आणि आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तलावाच्या सुशोभीकरण प्रकल्पानंतर नागरिकांना आपल्या कुटुंबासमवेत उत्तम वेळ घालवण्यासाठी एक चांगले ठिकाण शहरातच उपलब्ध होणार आहे. निळजे तलावाचे सुशोभीकरणाचे काम देखील सुरू असून या कामाचीही यावेळी शिंदे यांनी पाहणी केली. प्रकल्पाचे काम उत्तम दर्जाचे व्हावे, यासाठी संबंधितांना सूचनाही केल्या.



खिडकाळी शिवमंदिर परिसराच्या सुशोभिकरण प्रकल्पाचे काम सुरु आहे. सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वास जात आहे. खिडकाळी येथील शिवलिंग स्वयंभू असून मंदिराला देखील प्राचीन इतिहास आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसराचे पारंपरिक पद्धतीने सुशोभीकरण, घाट आणि आरतीसाठी जागा, भक्तांसाठी दर्शनाची सुविधा, मंदिर परिसरातील तलावाचे पुनरुज्जीवन यांसारखी विविध कामे सुरु आहे. या ठिकाणी असलेल्या तलावात बोटिंग सुविधा, जॉगिंग ट्रॅक यांसारख्या अनेक सुविधा उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पाहणी करून काम दर्जेदार आणि भाविकांना दर्शनासाठी कुठलीही गैरसोय होणार नाही या दृष्टीने करण्याच्या सूचना यावेळी सर्व पालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन ही घेतले. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


तर बदलापूरपासून ते थेट नवी मुंबई एअरपोर्टपर्यंत ॲक्सेस कंट्रोल मार्ग बांधण्यात येत असून तो कल्याण लोकसभेतील कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर असा समांतर पद्धतीने उभारण्यात येणार आहे. जेणेकरून या मार्गावर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला शहराबाहेर जायचे असल्यास अवघ्या १५ मिनिटांमध्ये बाहेर पडता येणार आहे. भविष्यामध्ये नवी मुंबई एअरपोर्ट हेच सध्याच्या मुंबई एअरपोर्टप्रमाणे पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार असल्याने कल्याण डोंबिवली परिसर हा तिसरी मुंबई नावारूपाला येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment