सिंधुदुर्ग : कोकणातल्या राजकीय वर्तुळातले फासे फिरल्याची बातमी समोर आली. देवगड नगरपंचायतचे दोन नगरसेवक तसेच तालुकाप्रमुख आणि शिरगांव ठाकरे गटाच्या निष्ठावंत नेत्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतलंय. देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम हे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेंनी ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांना भाजपाच्या दिशेने वळवले आहे. देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी भाजप पक्षामध्ये प्रेवेश केला आहे. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशानंतर सिंधुदुर्गातही अनेक नेत्यांनी कमळ हाती घेतल्याचं दिसून येत आहे. यावर मंत्री नितेश राणे म्हणाले,” ही फक्त सुरवात आहे. नगरसेवक, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख नंतर माजी आमदार अशी रांग लागलेली आहे. आम्हाला फक्त तारीख ठरवायची आहे. उबाठा नावाचा गट आता संपलेला आहे.
बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत. महाविकास आघाडीची भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे. आणि म्हणून जिल्ह्याचा विकास केवळ भाजपा करू शकते हा विश्वास जनतेत वाढत आहे. त्यामुळे चांगले कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. मात्र आम्ही चांगल्यातले चांगले कार्यकर्ते घेतो घाण घेत नाही.” येणाऱ्या काळात भाजपा पक्ष कोकणात एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.