Friday, March 21, 2025
Homeमहत्वाची बातमीफेब्रुवारीत एप्रिलसारखे उन्हाचे चटके !

फेब्रुवारीत एप्रिलसारखे उन्हाचे चटके !

उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे हवामान विभागाचे निरीक्षण

मुंबई (वार्ताहर) : जानेवारी महिन्यात काही दिवस गारवा अनुभवता आला. त्यानंतर कमाल तापमान ३० ते ३४ अंशाच्या आसपास असून किमान तापमानात देखील हळूहळू वाढ होत आहे. सध्या दिवसा शहरात उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. तर रात्री उकाडा जाणवत आहे. दर दोन दिवसांनी कमाल आणि किमान तापमानात होत असलेल्या बदलामुळे मुंबईकरांना त्या बदलांचा त्रास होताना दिसत आहे.

सध्याचा काळ हा तापमान बदलाचा काळ असून वाऱ्यांच्या दिशेमुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आहे तर किमान तापमान किंचित चढे असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. तसेच फेब्रुवारी महिन्यादरम्यान ऋतू बदलाची प्रक्रिया सुरू होते, त्यामुळे मुंबईच्या तापमानाचा पारा आता काहीसा वाढू लागला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस तापमानाचा पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत कमाल तापमान ३३ ते ३६ अंशादरम्यान राहील. यावेळी दिवसा उन्हाचा चटका जाणवेल. तसेच उकाड्याची देखील जाणीव होईल.

यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगराचे तापमान ३४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने मुंबईकरांना चांगलाच घाम फुटला आहे. शनिवारी, ३४.५ सांताक्रूझमध्ये कमाल तापमान नोंदले गेले. सध्या वाढलेले तापमान ही उन्हाळ्याची चाहूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले. तसेच सध्या कमाल तापमान हे सरासरीपेक्षा अधिक आहे. दरम्यान, मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत किमान तापमानाचा पारा अजूनही कमी आहे. मात्र, कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे ही उन्हाळ्याची चाहुल आहे. येत्या एक दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ अपेक्षित असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -