मुंबई : महाराष्ट्रावर जीबीएस अर्थात गुइलेन – बॅरे – सिंड्रोम (Guillain–Barré syndrome or GBS) या आजाराचे संकट घोंगावत आहे. राज्यात आतापर्यंत जीबीएस अर्थात गुइलेन – बॅरे – सिंड्रोम या आजाराने बाधीत असलेले १७० जण आढळले आहेत. यापैकी १३२ जणांना जीबीएस झाल्याचा अंतिम वैद्यकीय अहवाल आला आहे. डॉक्टरांनी राज्यात आढळलेल्या सर्व जीबीएसबाधीत रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या जीबीएसबाधितांपैकी पाच जणांचा मृत्यू या आजारामुळे झाला आहे.
जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावणार; रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार
ज्यांना गुइलेन – बॅरे – सिंड्रोम हा आजार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वैद्यकीय पथकाने काढला आहे. या रुग्णांच्या आणखी वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. रुग्णांच्या तब्येतीला लवकर आराम पडावा यासाठी उपचार सुरू आहेत. पण जीबीएसचे रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासन सावध झाले आहे. प्रामुख्याने दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी पिण्याआधी अथवा खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्याआधी उकळून थंड करुन आणि गाळून घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य द्या. परिसर स्वच्छ राखा. उघड्यावरचे खाणेपिणे टाळा. शुद्ध पाणी प्या, ताजे सकस आणि वातावरणाला अनुकूल असे पदार्थ खा; असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.