मुंबई : सध्या अभिनेता राहुल सोलापूरकर हा चर्चेचा विषय झाला आहे. त्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. या व्हिडिओमध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे विधान वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. राजकीय मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार या सगळ्यांनी राहुलने केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा धिक्कार केला आहे. यानंतर राहुलने आज (दि ५) तमाम शिवप्रेमींची माफी मागितली आहे.
राहुल सोलापूरकरने दिला माफीनामा
काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकरने एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत तो म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करण्यासाठी औरंगजेबाच्या बायकोला लाच दिली होती. त्या काळात कोणतेही पेटारे वगैरे नव्हते.” या विधानाने समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे राहुलवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यावर राहुलने माफीनामा दिला आहे. “माझ्या मनात शिवरायांबद्दल कोणतेही तुच्छ समज नाहीत. दीड महिन्यापूर्वी मी एक मुलाखत दिली होती.त्यादरम्यान इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात याबद्दल मी वक्तव्य केलेलं. शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका कशी झाली याबद्दल मी बोललो होतो. तसा संदर्भ काही इतिहासकारांनी लिहून ठेवला आहे. पण माझ्या या पूर्ण मुलाखती मधील ती दोन वाक्य वापरून काही लोकांनी वाद निर्माण केला. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा विचार माझ्या मनातही येणार नाही. त्या मुलाखतीमध्ये बोलताना मी लाच हा शब्द वापरला. त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. साम-दाम-दंड-भेद या तत्त्वानुसार शिवाजी महाराजांनी काम केलेले. त्याविषयी बोलताना महाराजांचा अपमान करण्याचा हेतू कुठेही नव्हता.” असं राहुल सोलापूरकर म्हणाला.
Rahul Solapurkar : ‘शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले’; मराठी अभिनेत्याचा खळबळजनक दावा!
काय म्हणाला राहुल सोलापूरकर ?
एका मुलाखतीत राहुल म्हणाला, ” छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले. तेव्हा तिथे पेटारे वगैरे काही नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन महाराष्ट्रात परत आले. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिल्याचे पुरावे इतिहासात आहेत. मोहसीन खान किंवा मोईन खान नावाच्या सरदाराकडून त्यांनी सही शिक्याचा अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेल्या परवाना दाखवूनच महाराज आग्र्यातून. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्याहून आले. त्यासंदर्भातले खूण आणि पुरावे देखील आहेत. हा सगळा इतिहास कथा स्वरूपात सांगायचं म्हटलं की थोडे रंग भरून सांगावा लागतो पण रंजकता आली की इतिहासाला छेद पडतो.”