२७ वर्षांनी सत्तेमध्ये कमळाची घरवापसी होण्याचा अंदाज
नवी दिल्ली : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवारी संपले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विविध सर्वेक्षण संस्थांनी (Exit polls) संध्याकाळी ६.३० नंतर एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसताना दिसत आहे. २७ वर्षांनंतर भाजप दिल्लीत पुन्हा सत्तेत येत असल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या ६९९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर होतील, पण प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की यावेळी दिल्लीत सरकार कोण स्थापन करेल. याबाबत एक्झिट पोल सर्व्हे येऊ लागले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. सर्व्हेनुसार भाजप दिल्लीत सरकार स्थापन करू शकते.
Udayanraje Bhosale : राहुल सोलापूरकर सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी बुधवारी संध्याकाळी मतदान संपल्यानंतर, ११ एक्झिट पोल जाहीर झाले. भाजपला ९ पोल्समध्ये बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे तर २ मध्ये आम आदमी पक्ष (आप) सरकार स्थापन करेल अशी शक्यता आहे. पोल ऑफ पोल्समध्ये भाजपला ३९, आपला ३० आणि काँग्रेसला एक जागा मिळताना दिसत आहे. जेव्हीसी आणि पोल डायरीने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये इतरांनाही प्रत्येकी १ जागा मिळू शकते असा अंदाज वर्तवला आहे.
यापूर्वी १९९३ मध्ये भाजपाने ४९ जागा जिंकल्या होत्या आणि ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बनवले होते. मदनलाल खुराणा, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज. तिन्ही नेत्यांचे मुलगे आणि मुली दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत. खुराणा यांचे पुत्र हरीश खुराणा मोती नगर येथून निवडणूक लढवत आहेत, तर साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र प्रवेश वर्मा नवी दिल्ली येथून निवडणूक लढवत आहेत. बांसुरी स्वराज या नवी दिल्लीच्या खासदार आहेत.
बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५७.८५% मतदान झाले आहे. मतदानाची वेळ संध्याकाळी ६ वाजता संपली, पण रांगेत उभे असलेले लोक अजूनही मतदान करत आहेत. रात्री उशिरा निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ६८ ते ७० टक्के मतदान झाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकार स्थापन करण्यासाठी ३६ जागांची आवश्यकता आहे.