डीपीडीसीच्या माध्यमातून विकासकामाला भरघोस निधी आणणाऱ्या पालकमंत्र्यांचे केले अभिनंदन
खासदार संजय राऊत यांचाही घेतला कडक शब्दांत समाचार
रत्नागिरी : सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठका यशस्वी झाल्या. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर निधी आणण्यात दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री यशस्वी झाले आहेत आणि त्यातून जिल्ह्यांचा विकास होईल. कोकण विकासाच्या जबाबदारीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा विश्वास कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी व्यक्त केला.
यावेळीच त्यांनी सातत्याने विचित्र वक्तव्ये करणाऱ्या उबाठा खा. संजय राऊत यांचा समाचार घेत ते कर्मदरिद्री माणूस असून नेहमीच निगेटिव्ह बोलत असल्याचे सांगितले. रत्नागिरी दौऱ्यावर आले असता आ. निलेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. सिंधुदुर्गमध्ये सोमवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जरी खासदार म्हणून राणे साहेब, पालकमंत्री म्हणून नितेश राणे आणि मी स्वतः आमदार म्हणून उपस्थित असलो तरीही याला कोणीही भावनिक किंवा कौटुंबिक दृष्टीने पाहू नका. जनतेने आम्हाला विकासासाठी निवडून दिलंय याची संपूर्ण जाणीव आम्हाला आहे. आमच्यावरील जबाबदारीची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे. त्यामुळे यापुढेही केवळ कोकणच्या विकासासाठीच काम केलं जाईल हे निश्चित आहे, असं आ. निलेश राणे यावेळी म्हणाले. तर पालकमंत्री म्हणून ना. नितेश राणे यांची पहिलीच नियोजन समितीची बैठक असतानाही ती त्यांनी यशस्वीपणे चालवली याचं मला कौतुक आहे, अशा शब्दांत त्यांनी ना. नितेश राणे यांचे कौतुक केले.
सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीतही डीपीडीसीची मिटींग यशस्वी झाली, चांगल्या वातावरणात बैठक झाली. इतिहासात प्रथमच रत्नागिरीचा प्रारूप आराखडा हा ८६० कोटींचा झालेला आहे, तर सिंधुदुर्गमध्ये प्रारूप आराखडा प्रथमच ४०० कोटींवर गेला आहे. याबद्दल ना. उदय सामंत आणि ना. नितेश राणे यांचे अभिनंदन करताना हा सगळा पैसा जिल्ह्याच्या विकासासाठी वापरला जाणार आहे याचे निश्चित समाधान आहे, असेही ते म्हणाले. रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या महागणपतीचे दर्शन आज आ.निलेश राणे यांनी घेतले. माझ्या सहकाऱ्यांनी रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्यावतीने रत्नागिरीच्या महागणपतीची स्थापना यावर्षी प्रथमच केली आहे. आमदार झाल्यानंतर प्रथमच रत्नागिरीत आलो आहे, त्याची सुरुवात श्रीगणेशाचे दर्शन घेऊन व्हावी अशी इच्छा होती, त्याप्रमाणे दर्शन घेऊन आता कामाला सुरुवात झाली आहे, असेही आ. निलेश राणे म्हणाले.
खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार
सातत्याने विचित्र वक्तव्य करणाऱ्या उबाठाचे खासदार संजय राऊत यांचा आ. निलेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला. संसद कशी चालवायची हे संजय राऊतांकडून शिकण्याची वेळ अद्याप देशावर आलेली नाही. तिसऱ्यांदा बहुमताने जे देशाचे पंतप्रधान झालेत त्यांना कधीही जनतेतून साधा नगरसेवक म्हणूनही निवडून न आलेला माणूस शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, यावरून या माणसाच्या विचारांची पातळी कळते. संजय राऊत हा कर्मदरिद्री माणूस आहे व त्यांच्या विचारातून काहीच चांगलं निघणार नाही. देश आणि महाराष्ट्रासाठी काही चांगलं होणार नाही, त्यामुळे त्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही, असा टोलाही आ. राणे यांनी लगावला. संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात आणि त्याला प्रसिद्धी मिळते यावरून राज्यातील महत्त्वाचे विषय संपले आहेत का? राजकारण इतके हीन झाले आहे का? असा सवाल आ. राणे यांनी केला. महायुतीचे सरकार हे समन्वयाने चालत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये योग्य तो समन्वय आहे. तिघेही महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत, असा विश्वास आ. राणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.