पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक
नवी दिल्ली : आज सकाळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर (Union Budget 2025) केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, लघू उद्योग, शेती, उत्पादन, रोजगारासह ३६ औषधांवरील करात सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पबाबत राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे.
‘अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रत्येक भारतीयाची स्वप्ने पूर्ण करणारा अर्थसंकल्प’ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासातील आजचा दिवस महत्त्वाचा टप्पा आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासातील आजचा अर्थसंकल्प गुंतवणूक आणि बचत वाढवणारा आहे. अर्थसंकल्पात सरकारची तिजोरी कशी भरली जाईल यावरच लक्ष केंद्रित केलं जातं. मात्र, हा अर्थसंकल्प त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. देशातील नागरिकांचे खिसे कसे भरले जातील, देशातील नागरिकांची बचत कशी वाढेल आणि देशातील नागरिक विकासाचे भागीदार कसे होतील, याचे उदाहरण म्हणजे हा आजचा अर्थसंकल्प आहे.
The #ViksitBharatBudget2025 reflects our Government’s commitment to fulfilling the aspirations of 140 crore Indians. https://t.co/Sg67pqYZPM
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2025
त्याचबरोबर, या अर्थसंकल्पात अत्यंत महत्त्वाची आणि ठोस पावले उचलण्यात आली आहेत. हा अर्थसंकल्प देशाची शक्ती वाढवणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढेल. तसेच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणा कृषी क्षेत्रात आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेत नव्या क्रांतीचा आधार ठरतील. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना आणखी मदत मिळेल’ असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.