मुंबई : राज्याला लागलेल्या प्रदूषणाची झळ कायम असताना काही दिवसांपूर्वी मुंबईत टप्प्याटप्प्याने पेट्रोल – डिझेलवर चालणाऱ्या गाड्या बंद करून इलेक्ट्रिक गाड्या चालू केल्या जाणार असल्याची चर्चा सुरु होती. अशातच आता राज्यात वाहतुकीच्या सुविधा वाढवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन महिन्यांत मुंबईत उबर, ओला टॅक्सी सारख्या बाईक टॅक्सी सेवा चालू केल्या जाणार आहेत. बाइक टॅक्सीसाठी परवाने देण्याचे कामही सुरू होणार असून, महिला प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असून त्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने अपुरी पडत आहेत. त्यामुळेच ज्या ठिकाणी वाहतुकीचे पर्याय आणि सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना झा समितीच्या अहवालात करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार आता मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढच्या दोन महिन्यांत रॅपिडोसारखी बाईक टॅक्सीसेवा मुंबईत सुरू होणार आहे. बाईक टॅक्सी सुरू करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
बुधवारी याबाबत अधिक माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले, ओला-उबरप्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार. मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यावर ठाणे आणि इतर महानगरांमध्ये ही सुविधा सुरू होऊ शकते. असे असले तरी बाईक टॅक्सीसाठी अनुकूल वातावरण असले तरी रिक्षा, टॅक्सीचालक संघटनांचा याला विरोध आहे.
मात्र या योजनेने प्रवाशांना जास्त वेळ खर्चिक घालून वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार नाही. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि अधिक झटपट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.