मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या अर्थात कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. हा रस्ता सोमवार २७ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे वांद्रे ते नरिमन पॉईंट हे अंतर जेमतेम १५ मिनिटांच पार करणे शक्य आहे. उत्तर वाहिनी पुलासोबत वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन आदी भागातील प्रवाशांना कोस्टल रोड प्रकल्पावर ये-जा करण्याची सुविधा देणाऱ्या तीन आंतरमार्गिकांचे लोकार्पण पण प्रजासत्ताक दिनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते. या आंतरमार्गिकाही वाहतुकीसाठी खुल्या झाल्या आहेत. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाची वैशिष्ट्ये
वाहतूक स्थिती : १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ५० लाख वाहनांचा प्रवास तर दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई किनारा रस्ता प्रकल्प व वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणारा पुल. या पुलाची एकूण लांबी ८२७ मीटर असून वजन २४०० मेट्रीक टन इतके आहे.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) हा प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे.
प्रकल्पाचे फायदे : वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत. याचे फलित म्हणून परकीय चलनाचीही बचत. ध्वनी प्रदूषण व वायुप्रदूषणात घट होण्यास मदत. ७० हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती. मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह साकारण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना नवीन विहारक्षेत्र लाभणार. या प्रकल्पात सागरी संरक्षण भिंतीची उभारणी. यामुळे किनाऱ्याची धूप होणार नाही आणि समुद्राच्या उंच लाटांपासून प्रकल्पाचे संरक्षण होईल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये : बोगदा खनन संयंत्राच्या साहाय्याने भारतातील सर्वात मोठ्या व्यास (१२.१९ मीटर) असलेल्या बोगद्याची निर्मिती. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यांमध्ये सकार्डो वायूजीवन प्रणालीचा वापर. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) उभारून पुलाची बांधणी. एकाच प्रकल्पामध्ये पुन:प्रापण करून रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग अच्छादित बोगदा, समुद्रक्षेत्र तसेच टेकडीखालून बोगदा, आरक्षणाची निर्मिती. भारतात सर्वप्रथम समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम. या प्रकल्पात प्रवाळांच्या वसाहतींचे स्थलांतर ९० टक्के यशस्वी
मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारा उत्तर वाहिनी पूल सुरू
मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका सुरू
बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आंतरमार्गिका सुरू
वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका सुरू
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
रस्त्याची लांबी – १०.५८ किमी
मार्गिका (४+४) बोगद्यांमध्ये (3+३)
पुलांची एकूण लांबी – २.१९ किमी
बोगदे- दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.०७२ किमी, अंतर्गत व्यास- अकरा मीटर
आंतरमार्गिका – तीन, एकूण लांबी – १५.६६ किमी
एकूण भरावक्षेत्र – १११ हेक्टर
नवीन विहारक्षेत्र – साडेसात किमी
हरितक्षेत्र – ७० हेक्टर
भूमिगत वाहनतळांची संख्या – ४
एकूण वाहनक्षमता – १८०० चारचाकी