Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Narendra Chapalgaonkar : माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन!

Narendra Chapalgaonkar : माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे निधन!

छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक-लेखक आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज, शनिवारी पहाटे निधन झाले. ते ८६ व्या वर्षांचे होते. चपळगावकर गेल्या काही महिन्यापासून कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.


त्यांचे पार्थिव दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या जयनगर येथील निवासस्थानी आणण्यात येईल. सायंकाळी ४ वाजता अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार प्रतापनगर येथे केले जाणार आहेत.


चपळगावकर यांचा जन्म १९३८ साली झाला. त्यांचे वडील हैदराबाद स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते. स्वातंत्र्य चळवळीतील अनेक बारकावे माहीत असणाऱ्या चपळगावकरांनी राजकीय आणि वैचारिक परंपरा हेच लेखनाचे केंद्रस्थान मानले. विधि आणि मराठी या विषयातील पदवी संपादन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात लातूरच्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर नंतर छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद्र पहाडे विधी महाविद्यालयातही अध्यापनाचे काम केले. २८ वर्षे वकिली व्यावसाय केल्यानंतर १९ जानेवारी १९९० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची निवड झाली. मराठवाड्यातील साहित्य आणि वाड्मयीन विश्वाला वळण देण्यात न्यायमूर्ती चपळगावकरांचा मोठा वाटा राहिला.



देशाच्या राजकीय स्थितीमध्ये हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊन या भागाचा इतिहास, सामाजिक, राजकीय वास्तव आपल्या लेखनातून त्यांनी मांडले.


चपळगावकर हे वर्धा येथील ९६ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. राजहंसचा ‘श्री. ग. माजगावकर स्मृती ’ हा वैचारिक लेखनासाठी पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेचा दिलीप चित्रे स्मृती पुरस्कार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


नरेंद्र चपळगावकर यांची एकूण ३६ पुस्तके प्रकाशित झाली होती. ज्यात तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या वरील चरित्रात्मक लिखाण असणारे कर्मयोगी सन्यासी, भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा या क्षेत्रातील दीपमाळ, नामदार गोखले यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरु व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयीचे कमालीचे औत्सुक्य त्यांच्यामध्ये होते.

Comments
Add Comment