मुंबई : देशभरात सध्या बेकायदेशीरित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कठोर कारवाई सुरु आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे अनेक बांगलादेशी राहत असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. अशातच मुंबईच्या कामाठीपुरा भागातून गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या महत्त्वांकाक्षी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) बांगलादेशी महिलेने लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांचा अटक करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
मुंबईत एका बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील कामाठीपुरा भागात राहणाऱ्या या बांगलादेशी महिलेने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता आणि तिला सरकारकडून लाभही मिळाला होता. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह ५ बांगलादेशी नागरिक आणि एका दलालाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
क्राइम इंटेलिजेंस युनिटने कामाठीपुरा भागात ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर स्थलांतर करण्यास मदत केल्याबद्दल आणि त्यांना आश्रय दिल्याबद्दल महादेव यादव या ३४ वर्षीय भारतीयालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या एका महिलेचे नाव उर्मिला खातून असे असून तिने लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपयांचे दोन हप्ते मिळवले असल्याचे समोर आले आहे. या बांगलादेशी महिलेचे आधारकार्ड बनावट असल्याचा दावा केला आहे.