मुंबई : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांना मुंबईतील अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने चेक बाउन्स प्रकरणात ३ महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, तब्बल ७ वर्षे चाललेल्या सुनावणीनंतर कोर्टाने मंगळवारी राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले आहे. रिपोर्टनुसार, वर्मा यांना नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले, जे बँक खात्यात अपुरी रक्कम किंवा खाते बंद असल्यामुळे चेक बाउन्स झाल्यास दंडाची तरतूद करते.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तक्रारदाराला नुकसानभरपाई म्हणून ३.७५ लाख रुपयांची रक्कमही भरावी लागणार आहे. जर त्यांनी ही रक्कम ३ महिन्यांच्या आत भरली नाही, तर त्यांना आणखी ३ महिन्यांची कैद होईल.
राम गोपाल वर्मा यांच्या कंपनीविरोधात २०१८ मध्ये श्री नावाच्या कंपनीने महेशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत चेक बाउन्सचा गुन्हा दाखल केला होता. जून २०२२ मध्ये, वर्मा यांना वैयक्तिक बाँड आणि ५,००० रुपयांच्या जामीन रक्कमेनंतर जामीन मंजूर करण्यात आला होता.
लॉस एँजेलिसमधील वणवा भडकला, आणखी ५० हजार जणांच्या स्थलांतराचे आदेश
सजा सुनावणाऱ्या मॅजिस्ट्रेट यांनी स्पष्ट केले की, “दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४२८ अंतर्गत कोणताही सेट-ऑफ लागू होणार नाही,” कारण राम गोपाल वर्मा “खटल्याच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या ताब्यात नव्हते.”
रिपोर्टनुसार, सजा सुनावणीच्या वेळी राम गोपाल वर्मा उपस्थित नव्हते आणि अद्याप या प्रकरणाचा तपशीलवार निर्णय बाकी आहे. मात्र, त्यांनी या प्रकरणावर एक्स (ट्विटर) वर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलेय की, “माझ्या आणि अंधेरी कोर्टाच्या बातम्यांच्या संदर्भात, मी स्पष्ट करू इच्छितो की हा माझ्या एका माजी कर्मचाऱ्याशी संबंधित २.३८ लाख रुपयांच्या रकमेचा ७ वर्षांपूर्वीचा मुद्दा आहे. माझे वकील या प्रकरणाचा अभ्यास करत आहेत आणि हे प्रकरण न्यायालयात असल्याने, मी यावर पुढे काही बोलणार नाही.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी २०२४ मध्ये ‘व्यूहम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, जो आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या अकाली निधनावर आधारित आहे. तसेच, ते नाग अश्विन यांच्या ‘कल्की २८९८ ई.’ या चित्रपटात एका कॅमिओ भूमिकेत झळकणार आहेत.