छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम विद्यापीठात रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना त्यांच्या भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पैठणीचा शेला, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि २ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी, पद्मभूषण सई परांजपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी पद्मभूषण सई परांजपे म्हणाल्या की, “आज इथे बोलत असताना नित्याचं साचेबंद वक्तव्य टाळून मी एवढेच म्हणते की, आजवर मी केलेल्या कामाची उशिरा का होईना पण दखल घेतली आणि आज मला हा मोठा आणि सुंदर असा ‘पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार’ सन्मान देऊन केला, त्याचा मी अतिशय आनंदाने आणि नम्रपणे स्वीकार करते. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका वेगळ्या धारणेने सुरू झालेला असून मराठवाड्यामधल्या रसिकाला खास आपला वाटेल असा हा उत्सव आहे.” शेवटी त्या म्हणाल्या, “आनंदाची गोष्ट अशी की गेल्या वीस वर्षामध्ये मराठी सिनेमाला उभारी आली असून आज वर्षाला किमान ५०-६० मराठी चित्रपट जन्माला येतात. आणि विशेष म्हणजे त्यातील अनेक सिनेमे शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या मातीमधून निपजतात. होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ, खाजगी व्यथा, सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवामधून यातल्या बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो. त्यातले काहीतरी तांत्रिकदृष्ट्या थोडे कच्चे असले तरी आशयाला पक्के असल्यामुळे हे सिनेमे थेट भिडतात. पण या सिनेमंडीमधून नानाविध विषयांना वाचा फुटली असल्याचे परांजपे म्हणाल्या.”
Manu Bhaker : मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली पदके परत करणार; नेमकं कारण काय?
या कार्यक्रमावेळी, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, फ्रिप्रेसी ज्यूरी चेअरपर्सन लतिका पाडगांवकर, अभिनेत्री सीमा बिस्वास, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.