मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त दोषींवर कडक कारवाईची मागणी व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी संरक्षणासाठी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गुरुवारी राज्यभरात ग्रामपंचायत बंद आंदोलन करण्यात आले.
राज्यातील अनेक जिल्ह्यांतील बहूतांश सर्व ग्रामपंचायतीने बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतीमध्ये स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ग्रामपंचायत काम बंद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती बंद राहिल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे निर्माण झालेला असंतोष ग्रामीण महाराष्ट्रात दिसून आला. तसेच सरपंच व त्यांचे सहकारी कर्मचारी हेही त्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायद्यासाठी आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभर दिसून आले.
सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सुचने नुसार राज्यातील सर्वच विभागात प्रत्येक जिल्ह्यात ग्रामपंचायतीने उत्स्फूर्तपणे बंद पळून त्याला चांगला प्रतिसाद दिला. राज्यातील सरपंच उपसरपंच कर्मचारी काही गावातील गावगुंडा पासून भयभीत झालेले आहेत समाजसेवा करताना अनेक जण यांच्या दबावाखाली काम करत आहेत तेलंगणा व राजस्थान मधील न्यायालयाच्या आदेशा प्रमाणे सरपंचाच्या फिर्यादी नुसार शासकीय कामातील अडथळ्याचा गुन्हा गाव गुंडावर दाखल करावा अशी मागणी केली.
यावेळी अध्यक्ष जयंत पाटील यांनी शासना कडे विविध मागण्या केल्या यात सरपंच व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी कायदा असावा , ग्रामसभेला काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते यामुळे प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण असावे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी देण्यात यावी संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी तसेच त्यांचे गावमध्ये स्मारक उभा करण्यात यावे सरपंचाला भविष्यात सुरक्षितता लाभण्या साठी त्यांना पेन्शन योजना तसेच त्यांना विमा संरक्षण शासना तर्फे देण्यात यावे.